नवी दिल्ली – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्या राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांची बैठक समाप्त झाल्यावर आपण मुख्यमंत्रिपदावर कायम राहणार असल्याचे सोरेन यांनी स्पष्ट केले. आजच्या बैठकीला ४३ आमदार उपस्थित होते आणि बैठकीतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री आहेत आणि यापुढेही तेच या पदावर राहणार असल्याचे कॉंग्रेसचे आमदार प्रदीप यादव यांनी सांगितले.
जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने सोरेन यांना तब्बल सात वेळा समन्स पाठवले आहेत. त्यामुळे ते आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील आणि त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन राज्याच्या मख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र सोरेन यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही आणि आज तर त्यांच्या राजीनाम्याशी संबंधित चर्चांनाच पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सोरेन यांनी २०१९ मध्ये मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्विकारली होती. आजच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सोरेन म्हणाले की माझी पत्नी निवडणूक लढवणार असल्याची जी शक्यता वर्तवली जाते आहे तो केवळ भारतीय जनता पार्टीचा कल्पनाविलास आहे. मी सत्ता माझ्या पत्नीकडे सोपवणार असा चुकीचा संदेशही त्यांच्याकडून पसरवला गेला आहे.
दरम्यान, ईडीकडून सात वेळा आलेल्या समन्सच्या संदर्भात त्यांनी ईडीलाच पत्र पाठवले आहे. मला इतक्या वेळा समन्स पाठवले आहेत ते आरोप कोणते आहे त्याची माहिती दिली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.