नवी दिल्ली – इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या कॉंग्रेस पक्षाने आणि डाव्या पक्षांनी केरळची लूट केली आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पक्षांवर तसेच आघाडीवर टीका केली आहे. केरळमध्ये प्रदीर्घ काळापासून डावे पक्ष आणि कॉंग्रेस सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असे ढोंग करत आले आहेत. राज्यातील भ्रष्टाचार असो, गुन्हेगारी असो अथवा परिवारवाद असो हे केवळ नावाला वेगवेगळे पक्ष आहेत.
हे दोन्ही पक्ष एकत्रितपणेच सगळे करतात. आता इंडिया आघाडी स्थापन करून त्यांनी घोषणाच केली आहे की त्यांची विचारधारा आणि धोरणांमध्ये काहीच फरक नाही असेही मोदींनी टीका करताना म्हटले आहे.
इंडिया आघाडी हा आमच्या आस्थेवर आघात आहे. त्यांनी आमचे सण, आमची मंदिरे यांनाही लूटीचे माध्यम बनवले आहे. सबरीमला येथे ज्या प्रकारची अव्यवस्था समोर आली आहे त्यामुळे भाविकांनाच गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. हा येथील राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे, असे नमूद करून मोदी पुढे म्हणाले की तुम्हाला स्मरत असेल की जोपर्यंत देशात कॉंग्रेस आणि डाव्यांची सरकारे होती तोपर्यंत मुस्लिम भगिनींना तिहेरी तलाकचा जाच होता. मोदींनी या तिहेरी तलाकमधून मुक्तीची गॅरेंटी या महिलांना दिली होती आणि ती पूर्ण करून दाखवली.
ते पुढे म्हणाले की हल्ली देशात मोदींच्या गॅरेंटीचीच चर्चा आहे. मात्र माझे असे मानणे आहे की देशातील महिलाच विकसित भारताच्या संकल्प सिध्दीसाठी सगळ्यांत मोठी गॅरेंटी आहेत. भारताच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये केरळच्या लेकींचा सहभाग राहीला आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही मोदींनी डावे आणि कॉंग्रेसवर केला.