चाफळ -चाफळ परिसरात गुरुवारी सायंकाळी 5 वाजता विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने चाफळ व वाघजाईवाडी येथील काही घरांचे पत्रे उडून गेले. यात संबंधित कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. चाफळ परिसराला गुरुवारी सायंकाळी 5 वाजता वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने झोडपून काढले. यावेळी विजांचा कडकडाट सुरू होता. चाफळ येथे गुरुवारी आठवडा बाजार असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्यावर लावलेल्या पालांत पावसाचे पाणी वाहून आले. त्यामुळे संपूर्ण भाजीपाला व इतर माल वाहून गेल्याने नुकसान झाले. बाजारात आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली.
वाघजाईवाडी येथील मारुती पवार यांच्या घरावरील संपूर्ण पत्रा उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चाफळ येथील पेंढारकर यांच्या घराच्या बाजूला असलेले नारळीचे झाड त्याखाली लावलेल्या चारचाकी गाडीवर पडल्याने नुकसान झाले. काशिनाथ राजाराम पाटील, विजयकुमार पाटील, शिवाजीराव चव्हाण यांच्या घरांवरील पत्रे वाऱ्याने उडून गेले.
गेल्या दोन दिवसांपासून चाफळ परिसरात प्रचंड उकाडा होता. गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाने ग्रामस्थांना थोडा दिलासा मिळाला आहे. हा पाऊस खरीप हंगामातील मशागतीसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी आनंदीत झाला आहे. या पावसाने काही ठिकाणी आंब्याची झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.