मुंबई: वातावरणीय बदलाची स्थिती लक्षात घेत, हवामान विभागाने मुंबई, पुण्यात ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. पुढील दोन दिवस अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
मुंबईत सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे हिंदमाता, दादर टीटी, शक्कर पंचायत, एसआयईएस महाविद्यालय, भेंडी बाजार जंक्शन, षण्मुखानंद हॉल, गोयल देऊळ, शेख मिस्त्री दरगाह मार्ग येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पावसाची शक्यता असून अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. याशिवाय अग्निशमन केंद्रावर पूर बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय एनडीआरएफच्या तीन तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.
वाहतूक कोलमडली
मुंबईच्या सखल भागात पाणी भरल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. मुंबईच्या तिन्ही मार्गावरची लोकल सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली होती. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने बेस्टनेही काही गाड्यांचे मार्ग बदलले होते. मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. हिंदमाता, दादर टिटी, कुर्ला, माटुंगा, गव्हाणपाडा, चेंबूर,अंधेरी अग्निशमन केंद्र, वर्सोवा, दहिसर, बोरिवली, धारावी, वरळी, कांदिवली आदी ठिकाणी पाणी भरले आहे. कुर्ल्यातल्या नेहरू नगरात, गोरेगावच्या मोतीलाल नगरात घरांमध्ये पाणी शिरले आहे. भुयारी मार्गांमध्ये पाणी भरले आहे. पुराच्या पाण्यात गाड्या बंद पडल्या आहेत. ठिकठिकाणी पाणी भरल्याने दादर हिंदमाता, किंग्ज सर्कल, प्रतीक्षानगर, चेंबूर नाका, बांद्रा, सायन आदी भागांतील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली आहे. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने साचलेले पाणीही ओसरू लागले. त्यामुळे पश्चिम रेल्वेने दुपारी बाराच्या सुमाराला उपनगरी सेवा सुरू केली.
नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
मिठी आणि पोयसर नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे नदीलगतच्या वस्त्यांमधल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी आज पालिका क्षेत्रातल्या मिलन सबवे, वांद्रे पूर्व आदी भागांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. गेल्या चोवीस तासांत कुलाबा इथे 252 मिलिमीटर आणि सांताक्रुझ इथे 268 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. राज्य सरकारने मंत्रालयासह शासकीय कार्यालयांना सुट्टी दिली आहे.