मुंबई – येत्या 24 तासात महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यातील विविध भागात पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असून पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह दहा जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून शनिवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला.
पुढील काही तासात या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना लांबचा प्रवास टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, बीड, लातूर, सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण दिसून आले तर गेल्या 24 तासात मुंबईत 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांना आज सायंकाळी जोरदार अवकाळी पावसाने झोडपले आहे. पावसामुळे काही भागातील शेतीचे नुकसान झाले तर काही भागातील शेतकरी मात्र सुखावला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन, भूईमूग यांसारख्या पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून नुकतेच पेरणी झालेल्या ज्वारी, हरभरा यांसारख्या पिकांना हा पाऊस मात्र वरदान ठरणार आहे.