वाघळवाडी -परिसरात शुक्रवारी (दि. 26) पहाटे आणि सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या परिसरातील बळीराजा सुखावला आहे. दि. 2 जूननंतर पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील पेरणीची कामे खोळंबली होती, मात्र लागोपाठ दोन दिवस पाऊस झाल्याने पेरणी आणि आडसाली ऊस लागवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांची जिवनदायनी असलेली नीरा नदीवरील धरणांची आजची स्थीती समाधानकारक आहे.
गेल्यावर्षी जूनच्या सुरवातीलाच नीरेच्या खोऱ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. मागील दोन दिवसांपासून या परिसरात पाऊस पडू लागला आहे. शुक्रवारी पहाटे पासून पावसाने जोरात बॅटिंग केली आहे. तर सायंकाळी पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली.