नवी दिल्ली – ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच पुढील पाच दिवस देशाच्या अन्य भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होईल असेही त्यांनी म्हटले आहे.
आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड, मणिपूर, सिक्कीम आणि उप-हिमालय पश्चिम बंगाल या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम-मेघालयात शुक्रवार, रविवार आणि सोमवार या दिवशी आणि अरुणाचल प्रदेशात रविवार आणि सोमवारी अतिवृष्टीचा अंदाज आहे. तसेच पुढील पाच दिवसांत मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
हिमाचल प्रदेश, दक्षिण हरियाणा, दिल्ली, नैऋत्य उत्तर प्रदेश, गुजरात, विदर्भ , छत्तीसगड, झारखंडमध्ये शुक्रवार आणि शनिवारी तीव्र उष्ण स्थिती निर्माण होईल. तेलंगणामध्ये शनिवार आणि रविवारी (2 एप्रिल आणि 3 एप्रिल) या दोन दिवसांत तीव्र उष्णता लाट निर्माण होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.