पुणे – खडकवासला धरणसाखळीमधील पानशेत, वरसगाव, आणि खडकवासला ही तीन धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून शुक्रवारी रात्री 1,712 क्युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यास सुरुवात झाली. घाटमाथ्यावर झालेल्या पावसाने चारही धरणांत पाणी येत असल्याने शनिवारी मध्यरात्री 3 वाजता हा विसर्ग 2,568 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.
वरसगाव धरणातूनही नदीपात्रात 450 क्युसेक तर वीजगृहांसाठी 600 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. टेमघर धरण 79 टक्के भरले आहे. दरम्यान, या चारही धरणांचा पाणीसाठा 28.75 टीएमसी (98 टक्के) झाल्याने शहराची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. मागील वर्षी याच दिवशी या चारही धरणांमध्ये 29.10 टीएमसी (99 टक्के) पाणीसाठा होता.
गेल्या 24 तासांत खडकवासला-33, पानशेत-44, वरसगाव-43 तर टेमघर धरण क्षेत्रात सर्वाधिक 55 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी दुपारनंतर पाऊस कमी झाल्याने सायंकाळी पाचनंतर विसर्ग 2 हजार 124 क्युसेक करण्यात आला.
नदीत पुन्हा जलपर्णीचे ढीग
ज्या-ज्या वेळी खडकवासला धरणातून विसर्ग करण्यात येतो, त्यावेळी पाण्यासोबत जलपर्णी वाहून येते. आता ऑगस्टनंतर जवळपास दीड महिन्यांनी पुन्हा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे या काळात फोफावलेल्या जलपर्णीचे ढीग पाण्यासोबत आले आहेत. महापालिकेजवळ नदीपात्रातील छोट्या पुलांवर ही जलपर्णी पुन्हा अडकली आहे.