भारतीय क्रिकेट संघाने आशिया करंडक स्पर्धा जिंकली. पाठोपाठ मायदेशात झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिकाही जिंकली. आता हाच विजयी धडाका एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतही कायम राहावा अशीच तमाम चाहत्यांची इच्छा आहे.
१९८३ सालानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तब्बल 28 वर्षांनंतर 2011 साली विश्वकरंडक जिंकला होता. मात्र, आता त्यालाही एक तप उलटून गेले आहे. त्यामुळे 2023 सालची विश्वकरंडक स्पर्धा जिंकत हा खंडही भरून निघाला पाहिजे. मात्र, त्यासाठी कोणा एका खेळाडूंवर अवलंबून राहता येणार नाही. कारण कितीही व्यक्तीसापेक्ष खेळ असला तरीही त्याला सांघिक खेळाचे कोंदण असते व हेच 1983 असो किंवा 2011 असो स्पष्ट दिसून आले. त्यामुळे मी म्हणजेच संघ असे जर कोणी समजत असेल तो समज जितक्या लवकर दूर होईल तितके भारतीय संघासाठी चांगले आहे.
पूर्वी सचिन तेंडुलकर बाद झाला की चाहते मैदान रिकामे करत होते, विराट कोहलीनेही काहीकाळ ही स्थिती निर्माण केली होती. मात्र, आता संघात असे काही नवोदित खेळाडू आले आहेत की जे खुद्द कोहलीच्याच स्थानाला हात घालण्याची धमक दाखवत आहेत. त्यामुळे यंदाचा विश्वकरंडक जिंकायचा असेल तर सांघिक कामगिरीवरच ही स्पर्धा खेळली पाहिजे.
गिलकडून खूप अपेक्षा
भारतीय संघाकडे सर्वोत्तम सेकंड बेंच आहे असे म्हटले जाते त्यात तथ्यही आहे. हेच ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका तसेच त्यापूर्वी झालेली आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा यांत संघात स्थान मिळालेल्या नवोदितांना विशेषतः शुभमन गिलने हे खरे करुन दाखवले आहे. त्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे. त्याच्याकडे पुस्तकी फलंदाजीसह इम्प्रोव्हायजेशनही आहे. ऑस्ट्रेलियाच्या एलिगंट मार्क वॉ याच्याप्रमाणे त्याची फलंदाजी हळूहळू बहरते व एकदा रंगात आली की तो चौफेर उधळतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने केलेल्या शतकी खेळीत चौकार व षटकारही फटकावताना त्याची लय पाहण्यासारखी होती. पूर्वी अशी लय मार्क वॉ याच्या फलंदाजीत दिसायची. गोलंदाजाला चोपूनही काढायचे पण त्याला तसे जाणवू द्यायचे नाही ही कला वॉ याच्यानंतर आता गिलकडेच असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे सलामीला कर्णधार रोहितसह संघाला सरस सुरुवात करुन देण्याची खूप मोठी अपेक्षा गिलवर राहणार आहे.
इशान व राहुलमध्ये स्पर्धा
लोकेश राहुल पूर्ण तंदुरुस्त ठरल्यामुळे निवड समितीची डोकेदुखी वाढली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत राहुलनेच संघाचे नेतृत्व करताना जबाबदारीने खेळही केला व नेतृत्वाची धूराही सांभाळली. या दोन्ही लढतीत इशान किशनही संघात होता. इशानने गेल्या मोसमापासून सातत्याने धावाही केल्या आहेत, तसेच यष्टीरक्षणाची जबाबदारीही व्यवस्थित हाताळली आहे. मात्र, जर राहुल पूर्ण फिट असेल तर इशानची संधी कमी होणार हे उघड आहे. एकाच संघात एकाच वेळी दोन यष्टीरक्षक फलंदाज ही चैन भारतीय संघाला मायदेशात ही स्पर्धा खेळताना परवडणारी नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत राहुलने एकदा यष्टीरक्षण केले व त्यात काही चुकाही झाल्या मात्र, तरीही निवड समिती, नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड विश्वकरंडकासाठी इशानला नव्हे तर राहुललाच पसंती देणार यात शंका नाही. विश्वकरंडकासारख्या इतक्या मोठ्या
स्पर्धेसाठी राहुलच्या जागी इशानला खेळवून प्रयोग करण्याची हिंमत द्रविड दाखवणार नाही ही देखील वस्तूस्थिती आहे. त्यामुळे जर राहुलची कामगिरी सुमार झाली किंवा त्याला दुखापत झाली तरच इशानला अंतिम संघात संधी मिळू शकते.
सूर्यकुमारकडून गुणवत्ता सिद्ध
एकदिवसीय सामन्यांसाठी सूर्यकुमार ठीक आहे का यावर बरीच खलबते झाली. टी-20 क्रिकेटमध्ये तो दादासारखी खेळी करतो म्हणूनच त्याला “मिस्टर 360′ असेही संबोधले जाते. मात्र, एकदिवसीय सामन्यांत तो फारसा यशस्वी ठरला नव्हता त्यामुळे तो वन डे मटेरियल नाही असाच सूर खुद्द निवडसमितीमध्येही उमटत होता. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने टी-20 प्लेअर हा ठसाही पुसून काढला व आपण एकदिवसीय सामन्यांतही यशस्वी होऊ शकतो हे सिद्ध केले. तसे पाहता सध्याच्या भारताच्या एकदिवसीय संघात चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर सूर्यकुमारसारखा फलंदाज असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण रोहित, गिल व कोहली लवकर सापडले तर मधल्या फळीत राहुलसह डाव सावरण्यासाठी सूर्यकुमारचे असणे अत्यंत गरजेचे आहे. आणि तो हे करु शकतो हे देखील त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिद्ध केले आहे. हार्दिक पंड्या अष्टपैलू असला तरीही गेल्या मोसमापासून आयपीएल स्पर्धा वगळता त्याच्याकडून डाव सावरला गेला अशा खेळी खूपच कमी झाल्या आहेत. त्याची गोलंदाजीही सिझनल फळासारखी यशस्वी होते. त्यामुळे पंड्याची उपयुक्तता सिद्ध झाली तर तो बोनस असेल मात्र, सूर्यकुमार ही फिक्स डिपॉझिट ठरेल यात शंका नाही.
जडेजा-अश्विन-कुलदीप
भारताचा अंतिम 11 खेळाडूंचा संघ पाहिला तर एकाच संघात तीन फिरकी गोलंदाज खेळवणे जरा अतीच ठरेल मात्र, स्पर्धा मायदेशात होत असल्याने ही चैन करायला हरकत नाही. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांच्या विरुद्ध नव्हे तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या परदेशी संघांविरुद्ध हे तीन गोलंदाज त्रिशुल ठरतील यात शंका नाही. आजवर ऑस्ट्रेलियाच्या संघाची इतकी त्रेधा अन्य कोणत्याही गोलंदाजीसमोर उडालेली पाहण्यात आलेली नाही, परंतु ऑफ स्पीन गोलंदाज त्यांच्यासमोर आला की त्यांची भंबेरी उडालेली अनेकदा पाहण्यात आली आहे. असे गमतीने म्हणतात, की ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भूताला भीत नाहीत इतके ऑफ स्पीन गोलंदाजीला भीतात. यातील विनोदाचा भाग सोडा; पण ऑस्ट्रेलियाच्या समोर या तीन गोलंदाजांचे त्रिकुट खेळवले गेले तर त्यांच्या डाव्या-उजव्या फलंदाजीवर दडपण येईल व जी गत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत झाली त्याचाच प्रत्यय विश्वकरंडकात येईल. जडेजाची फिरकी फसवी आहे, त्याच्याकडे चेंडूचा वेग कमीजास्त करण्याची कला असल्याने तो फलंदाजांना हातोहात गंडवू शकतो. कुलदीपबाबत बोलायचे तर त्याने गोलंदाजीची शैली बदलल्यापासून तो जास्त धोकादायक बनला आहे. त्याचे फ्लिपर, रॉंगवन, फास्टर व स्लोअर वन सहज खेळता येत नाहीत. हेच त्याने वेस्ट इंडीजमध्ये सिद्ध केले. त्यामुळे त्याची चायनामन गोलंदाजी भारतासाठी लकी ड्रॉ ठरू शकते.
शमी-सिराज-बुमराह
जसप्रीत बुमराह पूर्ण तंदुरुस्त ठरला ही भारतासाठी या स्पर्धेतील सर्वात जमेची बाजू म्हणावी लागेल. मात्र, तो सगळे सामने खेळेल असे त्याच्या देहबोलीतून वाटत नाही. कारण त्याच्या पाठदुखीने पुन्हा डोके वर काढू नये यासाठी त्याचा वापर खुबीने करावा लागणार आहे. त्याचे इनस्विंग, आउटस्विंग व प्रख्यात यॉर्कर प्रभावी ठरावेत असे वाटत असेल, तर त्याला होलसेलमध्ये सगळ्याच सामन्यांत खेळवणे योग्य नाही. ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्राचा जसा अस्त्र म्हणून वापर करत होती तसाच वापर बुमराहचा रोहितने केला पाहीजे. शमीचा अनुभव निश्चितच संघाच्या कामी येणार आहे. मात्र, त्यासाठी मैदान कोणते आहे, त्याची खेळपट्टी कशी आहे व मुख्यत्वे तिथे वातावरण कसे आहे याचा विचार करुन त्याला खेळवले गेले पाहिजे. ज्या खेळपट्टीवर स्विंग मिळत नाही तिथे शमी महागडा ठरतो हा इतिहास आहे. त्यातच त्याचा रिव्हर्स स्विंग वासीम अक्रमसारखा कोणत्याही खेळपट्टीवर यशस्वी ठरत नाही हे देखील विचारात घेतले पाहिजे. मोहालीत पाच गडी बाद केल्यावर इंदूरमध्ये एक बळी घेण्यासाठी कष्ट पडले होते.
त्यामानाने सध्या आपल्या गोलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ सिराजच असल्याचा विश्वास वाटतो. आशिया करंडकात त्याने श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम लढतीत टाकलेला स्पेल महान गोलंदाज कपील देव यांच्यासकट सगळ्याच महान गोलंदाजांनी खांद्यावर उचलून मिरवला असता. सिराजकडे स्विंग तर आहेच पण नवा चेंडू रिव्हर्स करण्याचीही हतोटी आहे. त्याच्याकडे बाउन्स आहे, हवेतून स्विंग मिळाला नाही तर ऑफ द पीच स्विंग करण्याचीही त्याच्याकडे कला आहे. असो, हे समीक्षण पुरे झाले. विश्वकरंडक स्पर्धा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे व आता समीक्षणाची बोलणी करण्यापेक्षा सामन्यांची पाहणी करणे इष्ट ठरेल. यंदा भारताने 12 वर्षांच्या प्रतीक्षेचा अंत करावा व देशवासियांना विश्वकरंडक विजेतेपदाची बक्षिसी द्यावी हीच अपेक्षा आहे.
अमित डोंगरे