मुंबई – जून महिन्याच्या अखेर म्हणजे उशिराने सुरुवात झालेल्या पावसाने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. मात्र त्यानंतर ऑगस्ट महिन्यात गायब झालेल्या पावसाने आज दहीहंडीचा मुहूर्त साधत सकाळपासून संततधारेने पुन्हा एकदा सुरूवात केली. त्यामुळे दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांनी दहीहंडीचा व पावसाचाही मनमुराद आनंद लुटला.
पावसाने दडी मारल्याने काहीशा उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांनाही आज काहीसा दिलासा मिळाला आहे. आज सकाळी 8 ते दुपारी 6 या कालावधीत शहर भागात 57.63 मिमी, पूर्व उपनगर भागात 76.94 मिमी तर,
पश्चिम उपनगर भागात 90.50 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर गोवंडी येथे 150 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे तर, घाटकोपर येथे 29 मिमी इतक्या कमी पावसाची नोंद झाली आहे.