पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सध्या हवेतील उष्मा वाढला असून, दुपारी तापमान सुमारे ३५-३६ डीग्री सेल्सिअस अंशापर्यंत जात आहे. त्यामुळे उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करा. त्याचे सर्वेक्षण आणि उपाययोजना करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
याबाबतचे पत्र राज्यभरातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्ह रुग्णालय, सर्व वैद्यकीय अधिकारी, स्थानिक स्वराज्यसंस्था यांना दिले आहे. तसेच या पत्रासोबत एक सूचनापत्रकही (हीट व्हेव्ह अॅडव्हायझरी) देण्यात आले आहे. दरवर्षी एक मार्चपासून उष्माघाताचे सर्वेक्षण करण्यात येते.
सन २०२३ पासून उष्माघाताचे सर्वेक्षण “आयएच आयपी – एनपीसीसीएचएच’ पोर्टलद्वारे करण्यात येत असून, याही वर्षी याच पोर्टल द्वारे ते करावयाचे आहे. सर्वेक्षणाचे प्रशिक्षण राष्ट्रीय स्तरावरून व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे २२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्या वरील सर्व संस्था यांनी हे सर्वेक्षण करावयाचे आहे, असे या आदेशात म्हटले आहे.
वैद्यकीय कर्मचारी, आरोग्य प्राधिकरणांसाठी सल्ला
– वैद्यकीय सुविधा तयार करा, औषधांचा पुरेसा साठा तयार ठेवा.
– उष्माघात समजण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करा.
– वृद्ध, लहानमुळे, कोमॉर्बिड व्यक्ती, रस्त्यावर, उन्हात काम करणारा कामगारवर्ग यांचे निरीक्षण करा.
– उष्णतेच्या लाटेत सुरक्षित कसे रहायचे या संबंधी लोकांना मार्गदर्शन करा, याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवा.
– आपत्कालीन सेवा आणि इतर विभागांशी समन्वय साधा.
– दिवसाचा सर्वात उष्ण भाग टाळण्यासाठी शाळेच्या वेळा बदलण्यासाठी विभागांशी समन्वय साधा.
– सार्वजनिक उद्याने बेघर लोक आणि फेरीवाल्यांसाठी खुली ठेवणे.
– शीतकेंद्रे उभारा
– स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या हवामान अंदाज आणि उष्णतेच्या सूचनांवर अपडेट रहा.
नागरिकांसाठी सूचना
– दिवसभर भरपूर पाणी प्या, कॅफिन किंवा अल्कोहोल असलेले पेय टाळा. रसदार फळे खा, प्रथिने जास्त प्रमाणात घेणे टाळा
– दुपारी ११ ते चार या वेळेत बाहेर पडणे टाळा. महत्त्वाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करा.
– सैल कपडे घाला, उष्णता शोषून घेणारे गडद रंगाचे कपडे घालणे टाळा.
– दुपारच्या वेळी शेतात काम करणे टाळा
– चेहऱ्याचे आणि डोळ्यांचे सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी टोपी आणि सनग्लासेस घाला.
– अशक्तपणा, चक्कर येणे, मळमळ होणे अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.
– दुपारच्या उन्हात सामाजिक मेळावे, कार्यक्रम घेणे टाळा.