पुणे- पुणेकरांसाठी पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य योजना बंद करण्यात आली आहे. या योजनांची फेररचना करून त्या पुन्हा सुरू करा, अशी मागणी भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
मोहोळ हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना या योजना कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. सलग पाच वर्षे या योजना सुरूही ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासक म्हणून अंदाजपत्रक मांडताना या योजनांना तरतूद न दिल्याने योजना बंद झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी भेट घेत मागणीचे निवेदन दिले आहे.
या दोन्ही योजना गरजू पुणेकरांसाठी पुन्हा सुरू होणे आवश्यक असून प्रशासनाने या योजनांची तातडीने अभ्यास करुन फेररचना करावी. या योजना पुणेकरांसाठी अत्यावश्यक आहेत. त्यामुळे यावर लवकरच निर्णय घेण्यात यावा, असे मोहोळ यांनी म्हटले आहे.