ज्या ज्यावेळी संधी मिळेल, त्या त्यावेळी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करायला हवेत. संघर्ष मधूनच सोडून देता कामा नये. असे केल्याने तुमच्यामध्ये एक प्रकारची उत्कटता निर्माण होईल आणि त्यामुळे संपूर्ण जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. विजयामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. जीवनातील प्रत्येक यश आपल्याला नवीन ऊर्जा देते. तणावग्रस्त राहिल्याने काहीच फायदा होत नाही, असे सांगत आहे ऑलिम्पिक विजेता खेळाडू नीरज चोप्रा…
प्रत्येक मावळते वर्ष आपल्याला एक धडा देऊन जाते आणि प्रत्येक उगवते वर्ष आपल्यासाठी एक नवीन आशा घेऊन येते. मैदानी स्पर्धांमधील एक खेळाडू म्हणून मागील वर्ष माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरले. ऑलिम्पिक स्पर्धेत खेळावे आणि पदक मिळवावे हे माझे स्वप्न होते. टोकियोमध्ये जेव्हा मी पोडियमवर उभा होतो आणि आपले राष्ट्रगीत वाजत होते, त्यावेळी मला मिल्खासिंग यांची आठवण येत होती. ते एक महान ऍथलीट होते.
हजारो-लाखो मुलांसाठी ते प्रेरणास्थान होते. ट्रॅक अँड फिल्डमध्ये एखाद्या भारतीयाने सुवर्णपदक पटकवावे अशी त्यांची इच्छा होती. त्या दिवशी जर ते हयात असते तर निश्चितच त्यांना खूप आनंद झाला असता; परंतु गेल्या वर्षी जूनमध्ये करोनाने त्यांना आपल्यापासून दूर नेले. या महामारीने आपल्यासमोर आपल्या अस्तित्वासंबंधी अनेक आव्हाने उभी केली आहेत; परंतु आपण त्यावर मात केलीच पाहिजे.
स्वतःबद्दलच बोलायचे झाले तर 2022 मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, डायमंड लीग, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धा आहेत. या विविध स्पर्धांची तयारी करण्यासाठी मी सध्या अमेरिकेत आहे. तयारी आणि फिटनेस नसताना कोणत्याही स्पर्धेत उतरण्यात काहीच हशील नाही. ही गोष्ट प्रत्येक खेळाडूने लक्षात घेतली पाहिजे. टोकियो ऑलिम्पिकनंतर मी युरोपात गेलो नव्हतो; कारण काही दिवस माझे प्रशिक्षण होऊ शकले नव्हते आणि मी आजारीही पडलो होतो. कसाबसा व्हिसा घेऊन मी जाऊ शकलो असतो; पण खेळात 100 टक्के प्रयत्न करू शकलो नसतो.
भालाफेकीकडे भारतीय खेळाडूंचा ओढा वाढला आहे, ही अत्यंत सुखावह गोष्ट आहे. यावर्षी या क्रीडाप्रकारात आणखीही अनेक खेळाडू चमकतील, अशी आशा करूया. छोट्या-छोट्या मुलांनाही भालाफेकीची ओढ वाटत आहे. अर्थात, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतील. उदाहरणार्थ, भाल्याची किंमत खूपच अधिक असते. त्यामुळे मुलांना तो उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यांना चांगले प्रशिक्षक उपलब्ध करून दिले पाहिजेत. प्रथितयश खेळाडूंनाही अधिक स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली पाहिजे. कारण ते जेवढे अधिक खेळतील तेवढेच अधिक चांगली कामगिरी करतील.
गेल्या वर्षी महामारीमुळे आलेली निराशा अनेकांना अस्वस्थ करीत असेल, हे खरे आहे. परंतु त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी खेळ आपल्याला मदत करू शकतात. खेळ हे असे माध्यम आहे, ज्यामुळे लोक फिट राहू शकतात आणि हळूहळू व्यावसायिक खेळाडू बनण्याच्या दृष्टीने आगेकूच करू शकतात. खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावरही हल्ली काम केले जाते, ही चांगली गोष्ट आहे. एक ऍथलीट आपल्या जीवनातील सर्वाधिक काळ खेळालाच देतो आणि त्यामुळे तो बाह्यजगापासून तुटतो.
कधी-कधी तणावातून बाहेर पडणे खूपच अवघड बनते. त्यामुळे मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यकही आहे. ज्याप्रमाणे मी एखाद्या स्पर्धेत उतरतो तेव्हा विजयासाठी सर्वस्व पणाला लावतो, तीच अपेक्षा मी देशातील युवा खेळाडूंकडून करतो. त्यांना ज्या-ज्यावेळी संधी मिळेल, त्या-त्यावेळी पूर्ण ताकदीनिशी त्यांनी प्रयत्न करायला हवेत. संघर्ष मधूनच सोडून देता कामा नये. असे केल्याने त्यांच्या आत एक प्रकारची उत्कटता निर्माण होईल आणि त्यामुळे त्यांच्या संपूर्ण जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. विजयामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते.
जीवनातील प्रत्येक यश आपल्याला नवीन ऊर्जा देते. तणावग्रस्त राहिल्याने काहीच फायदा होत नाही. अमेरिकेत आल्यावर जेव्हा मी सराव सुरू केला, तेव्हा खूपच अडथळे जाणवले. माझे वजन वाढले होते; परंतु शरीर थकले तरी मनाने मी स्वतःला प्रोत्साहित करीत राहिलो. त्यामुळे केवळ वीस दिवसांत मी पाच किलो वजन कमी करू शकलो. भालाफेक करताना माझा उजवा पाय उचलला जातो किंवा माझे शरीर खूप लवकर पुढील बाजूस झुकते. आता या सर्व त्रुटींवर मला काम करायचे आहे. मी या गोष्टींचा मुद्दाम उल्लेख अशासाठी केला की, आपली कमकुवत स्थाने आपल्याला माहीत असायला हवीत आणि त्यावर मात करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. जर तुम्ही असे करू शकलात तर यशस्विता तुमच्या पायाशी लोळण घेईल.
नववर्षाच्या शुभेच्छा देत असताना एक विनंती सर्वांना करायची आहे. ऍथलीट प्रत्येक वेळी स्पर्धा जिंकतोच असे नाही. कधी-कधी त्याला पराभवही पत्करावा लागतो. लोकांनी केवळ जिंकणाऱ्या खेळाडूलाच साथ न देता हरलेल्या खेळाडूलाही प्रोत्साहित करायला हवे. हे खूप आवश्यक असते. पडणाऱ्याचा हात कोणी धरला तर तो पुन्हा उठून उभा राहतो आणि पुन्हा एक नवीन विक्रम करण्याच्या दिशेने कार्यरत होतो, हेच जीवनातील सत्य आहे. या आशेसह सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा!