अरुण गोखले
प्रत्येक जीवास त्याच्या त्याच्या स्वधर्माचरणास प्रवृत्त करणे. कर्मयोगाचा पाठ शिकविणे. त्याची निष्क्रियता मोडून काढणे, हाच गीतेचा मूळ हेतू आहे. पण गीतेचे वैशिष्ट्य हे आहे की ती माणसांना कर्मयोगाचा पाठ शिकविते. पण त्याच बरोबर ती त्यातूनच त्यास निरपेक्ष कर्म योगाकडे म्हणजेच निष्काम कर्माचरणाकडे घेऊन जाते. कोणतेही कर्म हे त्याच्या फळाची अपेक्षा न धरता करणे म्हणजे निष्काम कर्मयोग.
आता हाच अवघड बोजड आणि कळायला कठीण वाटणारा विषय साध्या सोप्या कथा गोष्टी आणि प्रसंग निवेदनातून आपल्याकडे सांगितला गेला आहे. गुरूवर्य श्री. गोपाळ टाकळकर यांची प्राथमिक इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात असलेली एक छोटी पण मोठ्या आशयाची कथा आठवल्याशिवाय राहात नाही.
ती कथा अशी की, एक वयोवृद्ध आजोबा हे आपल्या बागेत अक्रोडाचे झाड लावीत असतात. त्यांची ती कृती पाहून त्यांना विचारले जाते की, “”आजोबा! अहो तुम्ही हे अक्रोडाचे झाड का लावताय? याला वाढवून त्याची फळे मिळायला तर फार वर्षे लागतील?” त्यावर ते आजोबा शांतपणे असे उत्तर देतात की “”बाबांनो! मला याची जाणीव आहे की मी जे झाड आज लावतोय, मी जे त्याला खतपाणी घालून वाढवणारही आहे. त्या झाडाची फळे ही मला नक्कीच खायला मिळणार नाहीत. कारण जेव्हा या अक्रोडाच्या झाडाला फळे येतील तेव्हा कदाचित मी या जगात नसेनही.
पण आज ज्या झाडांची फळे मी खातोय ती माझ्या मागच्या पिढीतील अशाच कोणी तरी फळाची अपेक्षा न धरता लावली असतील ना. त्यांनी ती काल लावली म्हणून मी आज त्याची फळे खातोय. तसे आज मी जे झाड लावतोय त्याची फळे उद्या माझी नातवंडे खातील. मी माझं झाड लावायचं आणि ते वाढवायचं कर्म करणारच. नाही तरी गीतेत सांगितलेला निष्काम कर्मयोग हा त्यापेक्षा वेगळा काय आहे?
अक्रोडाचे झाड ही पाठ्यपुस्तकातली कथा मी जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा एका साध्याशा कृतीतूनही गीतेच्या शिकवणीचे दर्शन कसे प्रभावीपणे घडते याचा मला अनुभव येतो. निष्काम कर्मयोगाचा मोठा बोध देणारी ती छोटीशी कथा मनात कायमचे घर करून राहिली आहे.