संयुक्त अरब अमिरातीमधील विविध शहरांमध्ये खेळवण्यात येत असलेली टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात असतानाच या स्पर्धेमध्ये अतिशय खराब कामगिरी केलेला भारतीय संघ मायदेशी परतला आहे आणि याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटमधील काही बदलही समोर आले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा दीर्घकाळ आधारस्तंभ असलेला कर्णधार विराट कोहली याने टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडल्यामुळे ही जबाबदारी आता
रोहित शर्माकडे देण्यात आली आहे तर दीर्घकाळ भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणारा रवी शास्त्री यांच्या जागीही आता भारतीय क्रिकेटच्या फलंदाजीची भिंत म्हणून ओळखला जाणारा महान फलंदाज राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या बदलांमुळे आगामी कालावधीमध्ये भारतीय क्रिकेटवर कसा परिणाम होतो हे दिसणार आहे. अर्थातच राहुल द्रविडसारख्या शांत, गंभीर आणि नियोजनबद्ध व्यक्तीच्या हातात भारतीय क्रिकेटचे प्रशिक्षकपद गेल्यावर त्याचा निश्चितच चांगला परिणाम दिसण्याचे संकेत मिळत आहेत. आतापर्यंत भारतीय क्रिकेट ऍकॅडमीचे प्रमुख पद भूषविणाऱ्या आणि भारतीय युवा क्रिकेटपटूंचा मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या राहुल द्रविड यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक युवा खेळाडूंचा विकास केला आहे. त्यापैकी काही खेळाडू सध्या भारतीय क्रिकेट संघामध्ये खेळत आहेत.
भारताचा मुख्य संघ जेव्हा इंग्लंडमध्ये खेळत होता तेव्हा दुसरा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर पाठवण्यात आला होता त्या संघाचे प्रशिक्षकपदही राहुल द्रविड यांनी सांभाळले होते आणि त्यावेळीसुद्धा भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली होती. अर्थात, राहुल द्रविड यांच्या नियुक्तीचे कौतुक करत असताना माजी प्रशिक्षक रवी शास्त्री किंवा माजी कर्णधार विराट कोहली यांच्या कामगिरीवर टीका करण्याचे काहीच कारण नाही. कारण शास्त्री आणि विराट कोहली या जोडगोळीने गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले हे कुणालाच नाकारता येणार नाही.
ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य देशाला त्यांच्याच देशात दोनदा पराभूत करण्याचे काम विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील या संघाला करता आले होते.तब्बल चार वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ अव्वल स्थानावर होता त्याचेही क्रेडिट अर्थात शास्त्री आणि विराट कोहली यांनाच द्यावे लागेल. केवळ आयसीसीने पुरस्कृत केलेल्या एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय क्रिकेट संघाला अपयश मिळाले म्हणून शास्त्री आणि विराट कोहली यांच्यावर टीका करण्यात काहीच अर्थ नाही.
कारण या दोघांनी आतापर्यंत भारतीय क्रिकेटची चांगलीच सेवा केली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये जो आक्रमकपणा आणि जिंकण्याची वृत्ती निर्माण झाली त्याला कोहली आणि शास्त्री यांची जोडी कारणीभूत आहे हेसुद्धा अनेक जण मान्य करतील. ठराविक कालावधीनंतर क्रिकेटमध्ये बदल करणे आवश्यक असल्याने आता हे बदल करावे लागले आहेत. विराट कोहली याने आपणहूनच टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडले आहे, पण एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटचे नेतृत्व मात्र आपल्याकडे ठेवण्याची त्याची इच्छा आहे.
ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मा सारख्या खेळाडूचा फॉर्म चांगला आहे आणि आयपीएलमध्ये मुंबईसारख्या मोठ्या क्रिकेट संघाचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माने आयपीएलमध्ये मुंबईला अनेकवेळा विजेतेपद मिळवून दिलेली आहेत. त्यामुळे ट्वेंटी-ट्वेंटीचे कर्णधारपद रोहित शर्माला मिळणार यात कोणतीच शंका नव्हती आणि अर्थातच त्याच्याकडून भारतीय क्रिकेटला मोठ्या अपेक्षा आहेत. रोहितकडे ही जबाबदारी दिली असल्यामुळे विराटला आता खासकरून कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करता येऊ शकेल.
दुसरीकडे शास्त्री यांच्या जागी राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे इतर प्रशिक्षकांची संपूर्ण टीमही बदलण्यात आली आहे. आपल्या आवडीची आणि पसंतीची प्रशिक्षकांची टीम घेण्याचे स्वातंत्र्य राहुल द्रविडला देण्यात आले आहे. आतापर्यंत गोलंदाजी किंवा फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून काम करणारे विक्रम राठोड आणि भारत अरुण यांनी चांगले काम केले आहे, पण काही नवीन लोकांना संधी देऊन त्याचा फायदा भारतीय संघाला मिळतो का हे पाहण्याचे काम राहुल द्रविडला करावे लागणार आहे.
भारतीय संघाच्या गुणवत्तेत कोठेही कमी नाही पण अति क्रिकेटमुळेच टी-20 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला यश मिळवता आले नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही. रवी शास्त्री यांनीही आपल्या शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आयपीएल वेळापत्रक आणि आयसीसी पुरस्कृत स्पर्धांचे वेळापत्रक याची कुठेतरी सांगड घालण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीतपासून भारतीय क्रिकेट संघ सतत बायोबबल वातावरणात वावरत असल्याने आणि आयपीएलच्या अतिरिक्त दबावामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला हे त्यांचे विश्लेषण योग्यच म्हणावे लागेल.
ज्या परिस्थितीमध्ये रवी शास्त्री भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पद सोडत आहेत आणि राहुल द्रविड ते प्रशिक्षकपद स्वीकारत आहेत त्या कालावधीमध्ये भारतीय संघ सध्या काही प्रमाणात खचला आहे हीसुद्धा एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल. कारण आता यापुढे जे काही घडणार आहे ते चांगलेच घडेल अशी आशा त्यामुळे निर्माण होणार आहे. नजीकच्या कालावधीमध्ये भारत काही प्रमुख देशांसोबत सर्व प्रकारचे क्रिकेट खेळणार आहे. सर्वप्रथम येत्या आठवड्यांमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये क्रिकेटची मालिका होणार आहे.
या मालिकेसाठी काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा सल्ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला ते बरे झाले. कर्णधार विराट कोहलीलाही आता विश्रांती मिळेल आणि सर्व प्रमुख खेळाडू ताजेतवाने होऊन नंतरच्या क्रिकेट मोसमासाठी उपलब्ध होतील. टी-20 संघाचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळणारा विराट किंवा या स्पर्धेसाठी विशेष मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आलेला महेंद्रसिंग धोनी यांनी आपापल्या परीने चांगले प्रयत्न करूनही भारतीय क्रिकेटला नशिबाची साथ न लाभल्याने त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
हे अपयश मागे सारून भारतीय संघाला नव्या उमेदीने नव्या प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली आपल्या क्रिकेटची उभारणी करावी लागणार आहे. सुदैवाने राहुल द्रविड यांच्यासमोर भारतीय क्रिकेट संघामध्ये काही नवे आणि ताजेतवाने चेहरे आहेत. यांच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगता येऊ शकतात त्यामुळे काही जुने आणि अनुभवी खेळाडू आणि काही नवे आणि गुणवान खेळाडू यांची योग्य सांगड घालून त्यांच्यातून सर्वोच्च कामगिरी मिळवण्याचे काम आता राहुल द्रविड यांना करावे लागणार आहे.