नवी दिल्ली – करोना उद्भवल्यानंतर नागरिकांच्या जीवनात बऱ्याच प्रमाणात अनिश्चितता निर्माण झाल्या. त्यामुळे रोख बाळगणे वाढले. परिणामी करोनाच्या काळामध्ये रोखीच्या व्यवहारात वाढ झाल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने डिजिटल व्यवहाराला चालना देऊनही रोखीच्या व्यवहारात वाढ झाल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका करण्यात येत होती. यावर सरकारतर्फे सांगण्यात आले की करोनाच्या काळात फक्त भारतातच नाही तर जगभरात रोखीच्या व्यवहारात वाढ नोंदली गेली आहे.
क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बॅंकिंग, यूटीआय इत्यादींच्या माध्यमातून सरकारने डिजिटल व्यवहाराला चालना दिली असून या सर्व पातळ्यांवर डिजिटल व्यवहार वाढत असल्याचे सरकारने सांगितले.
केंद्र सरकारने यूपीआय 2016 मध्ये सुरू केले असून त्याचा वापर वाढला आहे. गेल्या वर्षी या माध्यमातून 100 अब्ज डॉलरचे व्यवहार झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला. जेव्हा परिस्थिती अनिश्चित असते तेव्हा लवचिक स्वरूपातील चलन बाळगण्यावर नागरिकांचा भर असतो. करोनाच्या काळातही जास्तीत जास्त पैसा बाळगण्यावर नागरिकांनी भर दिला. आता परिस्थिती वेगाने सुधारत असून नागरिक पुन्हा डिजिटल व्यवहार करू लागले आहेत.
नोटांची संख्या वाढली
रिझर्व बॅंकेने नोटासंदर्भात जारी केलेल्या माहितीनुसार 4 नोव्हेंबर 2016 रोजी 17.74 लाख कोटी रुपयाच्या नोटा चलनात होत्या. मात्र 29 ऑक्टोबर 2021 रोजी 29.17 लाख कोटी रुपयाच्या नोटा चलनात होत्या. नोटा बंद केल्यामुळे अनौपचारिक अर्थव्यवस्था कमी झाली आहे. त्याचबरोबर चलनातील बनावट नोटाची संख्या कमी झाली असल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केला.