हेमंत महाजन
आसाम रायफल्सने नुकताच राष्ट्रीय एकता दिवस साजरा करताना, ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रतिज्ञा समारंभ, रन फॉर युनिटी कॅम्पेन असे असंख्य कार्यक्रमांचे आयोजन केले. यामुळे ईशान्येकडील राज्यांना बाकी देशवासीयांच्या बरोबर जोडण्यात मदत मिळेल.
आसाम रायफल्स हे भारतातील सगळ्यात जुने निमलष्करी दल आहे. या दलास 1913 साली आसाम रायफल्स हे नाव देण्यात आले. 1947 पासून या दलाने अनेक सुरक्षा कारवायांमध्ये भाग घेतला आहे. या दलाने दहशतवादविरोधी कारवाया, तसेच सीमा सुरक्षा कार्यात आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरी दलांना मदत केली आहे.
याशिवाय आसाम रायफल्स दुर्गम भागात दळणवळणाची, वैद्यकीय व शैक्षणिक मदत करते. युद्धकालीन परिस्थितीमध्ये देशाच्या सीमेच्या आतल्या भागांत सुरक्षा पुरविण्यासाठी या दलाचा उपयोग होतो.
2002 सालापासून आसाम रायफल्स म्यानमार सीमेवर तैनात आहे. या दलात 46 बटालियन असून त्यांत एकूण 66 हजार 411 सैनिक आहेत. हे दल गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. मात्र, लढाई करता हे भारतीय सैन्याखालती काम करते. आसाम रायफल्सचे जवान याआधी ईशान्य भारतातून भरती केले जायचे,
परंतु गेल्या अनेक वर्षांपासून भारतातल्या सगळ्या सीमावर्ती जिल्ह्यातील युवकांना आसाम रायफल्समध्ये भरती होता येते. यामुळे आसाम रायफल्समध्ये भारतातल्या प्रत्येक राज्यातील सैनिक आहेत. आसाम रायफल्सचे अधिकारी मात्र भारतीय सैन्यातून येतात.
आसाम, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, मेघालय व त्रिपुरा या सात राज्यांत आसाम रायफल्सला भूसेनेकडूनच दारूगोळा, हत्यारे, इतर युद्धोपयोगी सामग्री आणि प्रसंगी विमानाद्वारे अन्नपुरवठाही करण्यात येतो. याआधी आसाम रायफल्सचा वापर ईशान्य भारतातील बंडखोरी आणि भारत म्यानमार सीमा यांच्या रक्षणाकरता व्हायचा.
आता चीनच्या वाढत्या आव्हानामुळे त्यांच्या कामकाजामध्ये फरक केला जात आहे. काही ठिकाणी आसाम रायफल्स बंडखोर विरोधी अभियानातून काढून भारत-चीन सीमेवरती तैनात केले जाईल. याशिवाय पारंपरिक युद्धात लढण्याकरिता यांना मोठी शस्त्रे म्हणजे मोटर्स, ग्रेनेड लॉन्चर, मिसाइल, 105 मिलिमीटर जुन्या तोफा दिला जातील.
काही महिन्यांत आसाम रायफल्सला आसाममधून अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर पाठवण्यात येईल. अर्थातच ते भारतीय सैन्याच्या ऑपरेशनल कंट्रोल खालती असतील. म्हणजेच अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर आता भारतीय सैन्य आणि आसाम रायफल्स दोन्ही मिळून लक्ष ठेवतील.
महत्त्वाच्या ठिकाणी भारतीय सैन्य तैनात असेल व इतर ठिकाणी आसाम रायफल्सला तैनात केले जाईल. सध्या आसाम रायफल्सच्या 46 बटालियनपैकी 20 या भारत-म्यानमार सीमेवर तैनात आहेत. अजून नऊ बटालियन या सीमेवर येणाऱ्या काळामध्ये वाढवल्या जातील. बाकीच्या भारत-चीन सीमेवर तैनात होतील.
भारतीय सैन्याच्या 14 बटालियन म्हणजे दोन डिव्हिजन बंडखोरांविरुद्ध अभियानाकरता तैनात केल्या होत्या, त्यांना आता भारत-चीन सीमेकडे नेले जात आहे, कारण भारतीय सैन्याच्या आक्रमक कारवाईमुळे बंडखोरांचे आता कंबरडे मोडले आहे. सध्या ईशान्य भारतात या वेगवेगळ्या राज्यांमध्ये खास तर नागालॅंड, मणिपूर आणि आसाममध्ये 18 इंडिया रिझल्ट बटालियन उभ्या केल्या जात आहे,
याशिवाय अजून 4 सीआरपीएफच्या चार बटालियन तयार केल्या जात आहेत. बंडखोरांच्या विरुद्ध गरज पडली तर इंडिया रिझर्व्ह बटालियन आणि सीआरपीएफचा वापर केला जाईल. आसाम रायफल्स भारत-चीन सीमेकडे लक्ष ठेवेल.
आता सगळ्या खोऱ्याच्या मध्यभागी एक रस्ता बांधला जात आहे. ज्यामुळे आसाम रायफल्स आणि सैन्याची तैनाती किंवा कुठल्याही प्रकारची हालचाल एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात करायला सोपे पडेल. याशिवाय या भागात रस्ते अतिशय चांगले बनवले जात आहेत, जे सैन्याच्या हालचालीकरता उपयुक्त ठरतील. “आसाम रायफल्स’चे नियंत्रण गृह मंत्रालयाच्या अखत्यारित आणण्याचा मंत्रालयाच्या प्रस्तावाला लष्कराने विरोध दर्शविला आहे.
असे केल्याने भारत-चीनच्या संवेदनशील सीमेवरील टेहळणीवर परिणाम होऊ शकतो. चीन सीमाभागात सैन्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करीत असल्याच्या व आक्रमक कारवाईच्या पार्श्वभूमीवर हे धोकादायक ठरू शकते. सिक्कीम, अरुणाचल प्रदेशमधली भारत-चीन सीमा बळकट करण्याकरता आसाम रायफल्सवर लष्कराचे नियंत्रण जरुरी आहे.
भारत-म्यानमार सीमा पुरेशी सुरक्षित नाही, कारण या भागात सीमेजवळ राहणाऱ्या दोन्ही देशांच्या जाती आणि जमातींना एक दुसऱ्या देशात जायला परवानगी आहे. याला फ्री मुव्हमेंट रिजिम असे म्हटले जाते. यामुळे भारत-म्यानमार सीमा स्मगलिंग होणारी सीमा बनली आहे. म्हणून या सीमेवरतीसुद्धा लक्ष ठेवले जात आहे. मागच्या काही वर्षांमध्ये आसाम रायफल्सने या सीमेवर 900 कोटींहून जास्त रुपयांचे स्मगलिंग माल आणि ड्रग्स पकडले आहे.
म्हणूनच एकाच वेळेला आपल्याला भारत-म्यानमार आणि भारत-चीन सीमेकडे लक्ष द्यावे लागेल. आज बंडखोरी थोड्या प्रमाणामध्ये मणिपूरमध्ये सुरू आहे त्यावर लक्ष ठेवावे लागेल आणि चिनी सैन्याचे आव्हान ईशान्य भारताच्या सीमेवरती येऊ शकते. या सगळ्या आव्हानांना लगेच उत्तर देण्याकरता तयार राहावे लागेल. आसाम रायफल्स भारतीय सैन्याच्या मदतीला दिल्यामुळे ही आव्हाने स्वीकारणे जास्त सोपे झाले आहे.
आसाम रायफल्सचे जवान वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त होतात. जर त्यांना सैन्याला मदत करण्याकरता अतिउंच भागात जावे लागले तर मोठी अडचण होऊ शकते म्हणून त्यांचे रिटायरमेंट एज कमी करावे. रिटायर झाल्यानंतर आसाम रायफल्सच्या सैनिकांना सीमावर्ती भागात वसवण्यात आले तर भारत-चीन सीमा मजबूत होऊ शकते.