सातारा – गेल्या 30 वर्षाच्या समाजकारणामध्ये जनसेवा हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रयत्नरत राहिलो. विकासाची निरंतर प्रक्रिया चालू ठेवणे आणि जनसेवेचे हे व्रत असोशीने पाळणे हेच आमचे ब्रीद आहे. हे काम आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहणार आहे. घराण्याचा वारसा आणि वसा तितक्याच तोलामोलाने जपणार आहे, असे वचन खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना दिले.
सातारा विकास आघाडीच्यावतीने सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा मेळावा येथील विठ्ठल मंगलम कार्यालयात पार पाडला. त्यावेळी उदयनराजे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. माजी आमदार सदाशिव सपकाळ, ज्येष्ठ मार्गदर्शक व्ही. एस. ढाणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी सभापती सुनील काटकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना देशमुख, संदीप शिंदे, समृद्धी जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होत.
उदयनराजे म्हणाले, “”आजपर्यंत झालेली विकास कामे आपल्यासमोर आहेत. नुकताच रोजगार मेळावा घेऊन त्यामध्ये चौदाशे व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे साताऱ्याला उद्यमशील नगरी बनवण्यासाठी वेगवेगळ्या उद्योगपतींची चर्चा सुरू आहे. सातारा येथे आयटी पार्क करण्याकरता पशुसंवर्धन विभागाची जागा उद्योग मंत्रालयाकडे हस्तांतर करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणून बचत गटाच्या उत्पादित वस्तू सातारा, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी शासनाकडून जागा उपलब्ध करून त्याला व्यासपीठ मिळवून देण्याचे काम सुरू आहे. सातारा एमआयडीसीतील जागा नवनव्या कंपन्यांसाठी उपलब्ध होईल यासाठी काम सुरू आहे. कोयना, कण्हेर, महू धरणग्रस्तांचे पुनर्वसन या सर्व बाबींविषयी आम्ही प्रयत्नवादी आहोत.”
समृद्धी जाधव, सयाजी शिंदे, अर्चना देशमुख, संदीप शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ इत्यादी मान्यवरांनी आपल्या
भावना व्यक्त केल्या. उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. भाजप जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार यांनी सरल ऍप नमो इत्यादी उपक्रमांची माहिती दिली. सुनील काटकर यांनी प्रास्ताविक केले. संतोष कणसे यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगराध्यक्षा रंजना रावत यांनी आभार मानले. कार्यक्रमास जावळी तालुक्यातील सुमारे 2000 कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये जितेंद्र शिंदे, वीरेंद्र शिंदे, संदीप पवार, पंचायत समिती माजी सदस्य पृथ्वीराज निकम, राजेंद्र ढाणे, बबन देवरे, रामदास साळुंखे, सूर्यकांत पडवळ, विजय भिलारे, सुभाष शेडगे, रोहिणी निंबाळकर, बाळासाहेब ननावरे, नानासाहेब शिंदे, हैबत बापू नलावडे, सदाशिव बागल, बाळासाहेब खरात, सतीश माने, संजय पोतेकर, संजय मोहिते, अशोक चांदवड, लक्ष्मण कडव, नंदू माने, रणजीत माने, शफी इनामदार, अमोल तांगडे, गौरव माने इत्यादी उपस्थित होते.