– शिवशंकर निरगुडे / प्रतिनिधी
हिंगोली – हिंगोली जिल्हयात दुष्काळी अनुदान तातडीने वाटप करण्याच्या मागणीसाठी ताकतोडा (ता. सेनगाव) येथे शेतकऱ्यांनी सोमवारी मोबाईल टॉवरवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले आहे. जो पर्यंत अनुदान वाटप करणार नाही तो पर्यंत खाली उतरणार नसल्याची भुमीका शेतकऱ्यांनी यावेळी घेतली आहे.
हिंगोली जिल्हयात मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात कधी अवकाळी पाऊस तर कधी पावसाने खंड दिल्यामुळे काढणीला आलेले पिक हातचे गेले आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही. तर हिच परिस्थिती रब्बी हंगामात झाली असून, हरभरा पिकांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे.
आत्ता पेरणी पुर्वी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे रब्बी हंगाम अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे आज शेतकऱ्यांजवळ खत बियाणे घेण्यातसाठी पैसे नाहीत. अनेक वेळा आंदोलन करून देखील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळत नसल्याने आज ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन चालू केले आहे.
जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही खाली उरणार नाहीत. असं ते यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळालीच नसून जिल्हयातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने पंचनामे करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला आहे.
त्याअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ५ लाखा पेक्षा अधिक शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले आहे. शासनाने या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी निधी देखील जाहिर केला आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम मिळालीच नाही.
शेतकऱ्यांच्या इशाऱ्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं असून या प्रकरणात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी नामदेव पतंगे, अक्षय सावके, के. के. सावके, संदीप मानमोठे यांच्यासह शेतकऱ्यांनी सोमवार पर्यंत ता. २७ अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे अन्यथा मोबॉईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
मात्र शेतकऱ्यांच्या या इशाऱ्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे या शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी नऊ वाजता गावातील मोबाईल टॉवरवर चढून शोलेस्टाईल आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत अनुदान मिळत नाही त्या पर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे नामदेव पतंगे यांनी सांगितले.