IPL 2024 & Shreyas Iyer : मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है’. श्रेयस अय्यरला आपल्या कारकिर्दित गेल्या 6 महिन्यात अनेक चढ-उतार असलेल्या समस्यांना सामोर जावं लागले. त्याच्या या परिस्थितीला वरील शेर(काव्यपंक्ती) एकदम फिट बसतो. या काळात अय्यरला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. त्याला फक्त दुखापतीचा नाही तर बीसीसीआयच्या केंद्रीय कराराचाही फटका बसला. इतकेच नाही तर त्याला टीम इंडियातून काढून टाकण्याचा धक्काही सहन करावा लागला. तथापि, त्याने आपले धैर्य अबाधित ठेवले आणि एक नवीन भरारी घेत स्वत:ला साध्य करण्यात यश मिळविले. अशा ‘या’ अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) आयपीएल 2024 चॅम्पियन बनून सर्वांना आश्चर्यचकित केले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वार्षिक कराराची घोषणा केली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भारतीय संघातील दोन स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यामध्ये पहिले नाव श्रेयस अय्यरचे आणि दुसरे नाव ईशान किशनचे होते. काही नवीन खेळाडूंना स्थान देण्यात आले असताना या दोघांना मात्र वगळण्यात आले. यानंतर टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा त्या दोघांनाही त्यात स्थान देण्यात आले नाही. पण आता श्रेयस अय्यरने त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देत याचे उत्तर दिले आहे.
फेब्रुवारीमध्ये केली होती केंद्रीय कराराची घोषणा..
या वर्षी फेब्रुवारीमध्ये बीसीसीआयच्या केंद्रीय कराराची घोषणा करण्यात आली तेव्हा त्यात श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्या नावांचा समावेश नव्हता. याआधी या दोघांना अनेक वर्षे कंत्राट मिळत असले तरी यावेळी त्यांना जागा देण्यात आली नाही. याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. श्रेयस अय्यर आजारपणाचे कारण पुढे करून भारतीय संघापासून दुरावल्याचेही बोलले जात होते. आता यांत किती तथ्य आहे हे तर तोच जाणे. विशेष म्हणजे यावेळी बीसीसीआयने श्रेयस आणि ईशानचा समावेश न करता अनेक नवीन आणि तरुण खेळाडूंचा करारात समावेश केला होता.
टी-20 विश्वचषकातही मिळाले नाही स्थान…
त्यानंतर श्रेयस आणि ईशानला टी-20 वर्ल्डकपसाठी जाणाऱ्या टीम इंडियामध्ये स्थान मिळणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती. यानंतर संघाची घोषणा झाली तेव्हा नेमके तेच घडले. श्रेयस किंवा इशान किशन दोघेही संघात नव्हते. या दोघांसाठी हा धक्काच मानता येईल. म्हणून यानंतर श्रेयस आणि ईशान आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
श्रेयस अय्यरने प्रथमच पटकावून दिले आयपीएलचे विजेतेपद…
श्रेयस अय्यरने आपल्या संघासाठी काहीच मोठ्या खेळी खेळल्या, पण यावेळी त्याची भूमिका वेगळी होती. तो मधल्या फळीत येऊन संघाची धुरा सांभाळत होता. पण कर्णधाराचे सर्वात मोठे यश म्हणजे त्याच्या संघाने जेतेपद पटकावावे, जे श्रेयस अय्यरने केकेआरला पटकावून दिले. श्रेय्यस अय्यरने 14 सामने खेळताना 2 अर्धशतकासह एकूण 351 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट हा 146.86 असा होता.
केकेआरने आयपीएल जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे. एवढेच नाही तर श्रेयस अय्यर हा पहिला असा कर्णधार बनला आहे ज्याने दोन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करताना संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले होते. यापूर्वी श्रेयस अय्यर दिल्लीचा कर्णधार होता, पण तो आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही, पण आता तो आयपीएल जिंकणारा कर्णधारही बनला आहे.