फलटण – माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे सुरवडी, ता. फलटण येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, सुरवडी येथील रस्त्याचे काम करण्याची मागणी मी यापूर्वी खासदार रणजितसिंह यांच्याकडे केली होती. याची दखल घेत खा. रणजितसिंह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाच किमी लांबीच्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे या रस्त्यासाठी एक कोटी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
येत्या काही दिवसात या रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. लोणंद-फलटण पालखी मार्गापासून जगताप वस्ती, घार्गे मळा, पवार मळा ते पाच सर्कल या पाच किमी रस्त्याचे खडीकरण सुरवडी ग्रामपंचायतीमार्फत दोन ते तीन वेळा झाले होते. मात्र, खडी उखडल्याने या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्याने शेतीमालाची वाहतूक होते. त्याचबरोबर खराडेवाडी, मुरूम परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ असते. हा रस्ता व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी माझ्याकडे वारंवार केली होती. दरम्यान, या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांनी साळुंखे-पाटील आणि खा. रणजितसिंह यांना धन्यवाद दिले आहेत.