पुणे – बोपदेव घाटात पर्यटनास गेलेल्या जोडप्यास तीन जणांच्या टोळक्याने लुटले. यातील तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आला. संबंधित तरुणी बेशुद्ध असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना 16 ऑगस्टच्या रात्री सुमारास घडली.
याप्रकरणी आरिफ इसाक शेख (29, रा. पुणे स्टेशन) यांनी कोंढवा पोलिसांत तक्रार दिली आहे. शेख याचा कोंढव्यातील मैत्रिणीशी विवाह ठरला आहे. ते त्यांच्या चारचाकी वाहनातून बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेले होते. घाट फिरुन झाल्यानंतर घरी येताना उतरणीवरच्या शेवटच्या वळणावर मैत्रिणीस नैसर्गिक विधीसाठी जायचे असल्याने त्याने गाडी थांबवली. काही क्षणांतच मैत्रिणीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्या दिशेने आरिफने धाव घेताच त्याला मैत्रिणीसोबत तीन व्यक्ती झटापट करताना दिसले. त्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावत चाकूने वार केले. आरिफने त्यांना विरोध केला असता, टोळक्याने त्यांनाही धक्काबुक्की केली. यामुळे आरिफ यांनी त्यांचे पैशाचे पाकिट आरोपींना दिले आणि आरोपी डोंगर उतारावरून धावत निघून गेले. आरोपींनी सोन्याची चेन व रोकड असा 26 हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे.