नवी दिल्ली – दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोेलिसांनी पंजाबची सीमा सील केली आहे. तसेच अन्यही बंदोबस्त तैणात करण्याचे हरियाणा सरकारने योजले आहेत. शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारीला ‘दिल्ली चलो’ चे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने हरियाणा सरकारने अंबालाजवळील शंभू येथे पंजाबची सीमा सील केली आहे.
मोर्चा रोखण्यासाठी जिंद आणि फतेहाबाद जिल्ह्यांतील सीमेवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हरियाणा सरकारने अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा या सात जिल्ह्यांमध्ये ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान मोबाईल इंटरनेट सेवा आणि बल्क एसएमएस देखील बंद केले आहेत.
शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजधानीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी हरियाणा सरकारच्या उपाययोजनांदरम्यान, केंद्राने शेतकरी आंदोलकांना १२ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाने १३ फेब्रुवारी दिल्ली चलो मोर्चाची हाक दिली आहे. त्याला दोनशे शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. हमी भावाचा कायदा त्वरीत कार्यान्वित करावा या मुख्य मागण्यांसह त्यांच्या अन्यही बऱ्याच मागण्या आहेत.
हरियाणातील शंभू सीमेवरील घग्गर उड्डाणपुलावरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, पोलिसांनी रस्त्यावर सिमेंटचे बॅरिकेड्स लावले आहेत. शंभू सीमेवर काटेरी तार, वाळूच्या गोण्या, काँक्रीट ब्लॉक बॅरिकेड्स आणि इतर वस्तूंचा साठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना महामार्गापर्यंत पाहोचता येऊ नये म्हणून घग्गर नदीचे पात्रही खोदण्यात आले आहे. जिंदमध्ये, हरियाणा-पंजाब सीमेजवळील दोन रस्ते वाहनांच्या हालचालीसाठी बंद करण्यात आले आहेत आणि आणखी दोन रस्त्यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.फतेहाबाद जिल्ह्यात, पंजाबमधून दिल्लीकडे जाणाऱ्या निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी जाखल रस्त्यावर सिमेंटचे बॅरिकेड्स आणि अणकुचीदार पट्टेही लावले आहेत.
शेतकऱ्यांनी अंबाला-शंभू सीमा, खनौरी-जिंद आणि डबवली सीमेवरून दिल्लीला जाण्याचे नियोजन केले आहे.पोलिसांनी गावातील सरपंच आणि खाप पंचायतींच्या बैठका घेऊन त्यांना मोर्चात सहभागी न होण्यास सांगितले आहे. दरम्यान राज्य सरकारच्या या दडपशाहीचा शेतकरी नेत्यांनी निषेध केला आहे.