चंडीगड :- नूह हिंसाचारानंतर हरियाणा सरकारने फिरोजपूर झिरका मतदारसंघातील कॉंग्रेस आमदार ममन खान यांची सुरक्षा काढून घेतली आहे. नूह येथील हिंसाचाराशी ममन खानचे नाव जोडले जात आहे. ममन खान यांनी विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना मोनू मानेसर यांना मेवातमध्ये येण्याचे आव्हान देणारे आक्षेपार्ह विधान केले. त्याचबरोबर अनेक संघटनांनी ममन खानवर हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला आहे.
दुसरीकडे, सुरक्षा हटवल्याने ममन खानने आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे. यासंदर्भात त्यांनी डीजीपी, सीआयडी प्रमुख आणि गुरुग्राम पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. त्यांना सतत धमक्या येत असल्याने त्यांची सुरक्षा बहाल करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
नूह येथे 31 जुलै रोजी झालेल्या हिंसाचारापासून कॉंग्रेस आमदार ममन खान यांना प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर त्यांना हिंसाचारासाठीही जबाबदार धरले जात आहे.
मोनू मानेसर यांच्याबद्दल त्यांनी विधानसभेत म्हटले होते की, ते मेवातमध्ये आल्यास लोक त्यांच्यावर तुटून पडतील. याशिवाय राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. ममन खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहे.