काही माणसे जन्मत: संयमशील, संस्कारी व कृतीशील विचारांशी प्रेरित होऊन या जगात प्रवेश करतात. याचे मूतीर्मंत उदाहरण श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष व पुण्यातील जयगणेश व्यासपीठाच्या संस्थापक सदस्यांपैकी आग्रही असणारे व पेशाने सिव्हिल इंजिनिअर असणारे महेश शंकरराव सूर्यवंशी. त्यांच्या (दि. 16 ऑक्टोबर) सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने…
महेशचे वडील कै. आप्पा सूर्यवंशी सरकारी नोकरीत होते, परंतु एक विचार व अभय मैत्रीमुळे कै. तात्या गोडसे, कै. मामा रासने, कै. के.डी. रासने व इतर त्या परिसरातील काही मंडळींनी एकत्र येऊन दगडू हलवाई गणपती ट्रस्टची धुरा मोठ्या आव्हानाने स्वीकारली आणि ती यशस्वी करून पुण्यात नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणपती मंडळ म्हणून एकविचाराने एक दिलाने काम केले. एक वेगळा इतिहास आपण निर्माण करू शकतो, हे दाखवून दिले. लोकांचा पैसा लोकांसाठी खर्च करून समाज सुदृढ करावयाचे काम या मंडळींनी सुरू केले. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आपण पहात आहोत.
लहानपणापासून महेशच्या मनात सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली आणि तेथून त्याने सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून सन 1983-84 साली कार्यकर्ता म्हणून कामाचा श्रीगणेशा केला. सुमारे 10 वषार्नंतर सन 1996 साली मंडळाच्या कार्यकारिणीवर त्याची निवड झाली. हे करत असताना त्याने आपले शालेय शिक्षण नू.म.वि. शाळा आणि नंतर एम.आय.टी. मधून करीत बी.ई. सिव्हील ही पदवी संपादन केली.
हळुहळू या ज्येष्ठ लोकांच्या नजरेत तो आला. तसेच कै. अशोक गोडसे, सुनील रासने, माणिकदादा चव्हाण हे देखील आले आणि यांच्या कामाची दखल घेऊन सन 2001 साली दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या विश्वस्तपदी या तरुणाची निवड करण्यात आली. जुन्या पिढीचा अनुभव व नव्यांची संकल्पना याचा मेळ बसवून महेश व त्यांच्या साथीदारांनी ट्रस्टच्या कार्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या जयगणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत ट्रस्टच्या वतीने गरीब व गुणवान अशा 550 विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक पालकत्व जोपर्यंत त्यांची शिकण्याची इच्छा आहे, तोपर्यंत स्वीकारले आहे. ग्रामीण भागातील 60 शाळांना ई- लर्निंग व शुद्ध पाण्याची उपकरणे दिली. हा उपक्रम अविरतपणे आजही महेश व त्याचे सहकारी यशस्वीपणे राबवित आहेत. पुणे आणि परिसरातून ससून रुग्णालयामध्ये येणाऱ्या 1500 रुग्णांना दररोज दोन वेळचे जेवण, नाष्टा, चहा दिला जातो. तसेच गरोदर महिलांच्या 5 वॉर्डचे नूतनीकरण, रुग्णांच्या 100 नातेवाईकांकरिता विश्रामगृह इ. सुविधा देत आहेत. याचबरोबर पुणे शहरात ट्रस्टच्या माध्यमातून 24 तास मोफत रुग्णवाहिका सेवा व महाराष्ट्रात कोठेही फक्त डीझेल खर्चात उपलब्ध आहे. जयगणेश संपूर्ण ग्राम अभियान दुष्काळग्रस्त पुरंदर तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना दररोज ट्रस्टद्वारे 1 लाख लिटर पाण्याचे मोफत वितरण करण्याचे कार्यही त्यांनी अखंडीतपणे सुरू ठेवले आहे. तर गणेशोत्सव मंडळांना एकत्र करित खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे काम करण्यातही महेश अग्रभागी होता. बदलत्या वातावरण व भविष्याचा विचार करून जय गणेश निसर्ग संवर्धन अभियानाच्या माध्यमातून सन 2015 पासून आषाढी वारीतील रस्ते, पालखी तळ व अष्टविनायक महामार्गावरील रस्त्यावर 50 लाख झाडे लावण्याचा उपक्रम राबवित आहे. तसेच, येवलेवाडी येथील कुष्ठरुग्णांना स्वयंपूर्ण बनविण्याचे कार्य ट्रस्टच्या माध्यमातून यशस्वीपणे सुरू आहे.
महेश व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असून ट्रस्टचा आर्थिक कारभार सांभाळत असताना आपला व्यवसायही अगदी थोड्या अवधीत यशस्वीपणे उभा केला. सामाजिक कार्य करताना घर, परिवार, मित्रमंडळी त्यांच्या सुख-दु:खात वेळेवर हजर राहण्याचे बाळकडू वडील आप्पासाहेब यांच्याकडून उपजत आल्याने ते ही तो यशस्वीपणे सांभाळत आहे. वैवाहिक जीवनात त्याची पत्नी सौ. ज्योती सूर्यवंशी यांच्या भक्कम पाठिंब्यावर त्याने आपल्या मुलालाही बी.ई. सिव्हील करून व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण घेण्यात प्रेरित केले आहे व मुलगी डॉक्टर झाली आहे. ही दोन्ही मुले जुळी आहेत.
शांत, संस्कारीय, कमी बोलून कृतीशील व विधायक काम करून आपला ठसा निर्माण करणाऱ्या आमच्या या मित्राचा हा सुवर्ण महोत्सवी प्रवास निश्चितच सार्वजनिक क्षेत्रात कार्यकर्त्यांच्या नवीन पिढीला प्रेरणादायी ठरो व आमच्या या मित्रास गणरायानी समाजापयोगी कार्यासाठी उदंड आयुष्य देवो व ते आरोग्यदायी असो, ही श्रीं चरणी प्रार्थना!
– ऍड. प्रताप व्ही. परदेशी
अध्यक्ष, कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्ट पुणे
विश्वस्त, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, पुणे