मुलायमसिंह यादव हे स्वातंत्र्योतर भारतीय राजकारणातील एक प्रदीर्घ अनुभव असणारे नेते होते. केंद्रातील सत्तेचा राजमार्ग असणाऱ्या उत्तर प्रदेशसारख्या सर्वांत मोठ्या राज्यातून तब्बल आठ वेळा विधानसभा सदस्य आणि सात वेळा लोकसभा सदस्य आणि उत्तर प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेला हा नेता एकेकाळी केंद्रातील सत्तेचा किंगमेकर होता. कुस्तीच्या आखाड्यातील पैलवानकीमध्ये मैदान मारलेल्या मुलायमसिंहांनी राजकीय आखाड्यातही अनेक दिग्गजांना चितपट केले होते. त्यांच्या जाण्याने एका पर्वाचा अस्त झाला आहे.
स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणात प्रदीर्घ काळ सक्रिय राहिलेल्या ज्येष्ठ-बुजुर्ग आणि प्रभावी नेत्यांमध्ये समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचा समावेश होता. तब्बल साडेपाच दशके चाललेल्या मुलायमपर्वाची अखेर सांगता झाली आहे. मुलायमसिंगांनी समाजवादाची कास धरली.
मुलायमसिंग यांनी चौधरी चरणसिंह यांच्या साहाय्याने राजकारणातील डावपेच आत्मसात केले. या डावपेचांमुळेच कुस्तीच्या आखाड्यात पैलवानकी गाजवणारे मुलायमसिंह राजकीय आखाड्यातसुद्धा अनेकांना चितपट करणारे ठरले.
अनेक रथीमहारथी राजकीय नेत्यांना त्यांनी धूळ चारली मुलायमसिंहांची राजकीय कारकीर्द अनेक अर्थांनी गाजली. केंद्रातील सत्तेचा राजमार्ग असणाऱ्या उत्तर प्रदेशसारख्या आकारमानाने सर्वांत मोठ्या राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री पद साभाळलेल्या मुलायमसिंह यांनी अथक परिश्रम करून समाजवादी पक्षाचा विस्तार केला. केंद्रात वजन असणारा नेता अशी त्यांची उत्तर प्रदेशसह देशभरात ख्याती होती. त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणूनही पदभार सांभाळला. मात्र क्षमता असूनदेखील पंतप्रधानाच्या खुर्चीपर्यंत त्यांना शेवटपर्यंत पोहोचता आले नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात जग दुसऱ्या महायुद्धाच्या झळा सोसत असताना देशात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचे स्वरूप बदलत होते. त्याच काळात 1939 मध्ये उत्तर प्रदेशातील इटावाच्या सैफई गावात मुलायमसिंहांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुघरसिंह आणि आईचे नाव मारुतीदेवी. शेतकरी कुटुंबात जन्मलेले मुलायमसिंह तरुणपणी आखाड्यात कुस्तीचे डावपेच आखत होते. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात एकंदर भारतीय जनमानसावर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा प्रभावी करिश्मा होता.
अगदी तळागाळातील जनतेमध्ये नेहरू कमालीचे लोकप्रिय होते. मात्र नंतरच्या काळात डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वात देशात कॉंग्रेसविरोधी लढा आकाराला आला आणि समाजवादाची लाट पसरू लागली. मुलायमसिंह यादव हेसुद्धा या कॉंग्रेसविरोधी लढ्याचा हिस्सा बनले. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी या आंदोलनात उडी घेतली. लोहिया यांच्या 24 फेब्रुवारी 1954 रोजी “नहर रेट’ आंदोलनामुळे उत्तर प्रदेशात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तत्कालीन सरकारने हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. लोहिया आणि त्यांच्या समर्थकांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यानंतर पूर्ण उत्तर प्रदेशात याचा निषेध नोंदवण्यात आला आणि मोर्चे काढण्यात आले. इटावा जिल्ह्यातसुद्धा आंदोलन सुरू होते. इटावा जिल्ह्यात नत्थू सिंह आणि अर्जुन सिंह भदौरिया या आंदोलनाचे नेतृत्व करीत होते. प्रशासनाने या मोर्चात सहभागी झालेल्या जवळपास दोन हजार लोकांना अटक करून तरुंगात टाकले. यामध्ये मुलायमसिंह यादवसुद्धा होते. तेव्हा त्यांचे वय केवळ 15 वर्षे होते.
नत्थू सिंह यांना मुलायमसिंह यांचे राजकीय गुरू मानले जाते. सुरुवातीपासूनच त्यांनी मुलायमसिंह यांच्यातील गुण हेरले होते. विशेषतः मुलायमसिंहांच्या पैलवानकीने त्यांना प्रभावित केले होते. मुलायमसिंह यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातही जसवंतनगर या नत्थू सिंह यांच्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून केली. 1967 मध्ये नत्थू सिंह यांनी स्वतः राम मनोहर लोहिया यांना जसवंत नगरचे तिकीट मुलायसिंह यांना देण्यास सांगितले होते. या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मुलायमसिंह यांनी बलाढ्य कॉंग्रेस पक्षाच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव केला. वयाच्या 28 व्या वर्षी सर्वात तरुण आमदार म्हणून मुलायमसिंह उत्तर प्रदेशात निवडून आले.
मुलायमसिंह यादव यांना 27 जून 1975 रोजी अटक करण्यात आली. एका भालेपुरा नावाच्या गावात जमिनीचा वादविवाद मिटवण्यासाठी ते गेले होते. पंचायत बैठकीच्या दरम्यान पोलिसांनी गावाला चहुबाजूंनी वेढा घातला आणि मुलायमसिंह यांना “मिसा’ अंतर्गत अटक केली. जानेवारी 1977 पर्यंत जवळपास 18 महिने मुलायमसिंह इटावाच्या तुरुंगात होते. या दरम्यान त्यांचे सर्व कामकाज त्यांचा भाऊ शिवपाल यादव सांभाळत होते. तुरुंगातून त्यांचा संदेश समर्थकांपर्यंत पाहोचवण्याचेही काम शिवपाल यांनी केले होते.
आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी आणि कॉंग्रेस यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले होते. 1977 च्या निवडणुकांमध्ये जनता पक्ष उदयाला आला होता. देशात मोरारजी देसाई यांचे सरकार आले तेव्हा त्यांनी अनेक राज्यातील कॉंग्रेसची सरकारे बरखास्त केली होती. उत्तर प्रदेशातही निवडणूक झाली आणि राम नरेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. त्यांच्या मंत्रिमंडळात मुलायमसिंह यांना स्थान देण्यात आले. त्यांच्याकडे सहकार हे खाते सोपविण्यात आले. अशा प्रकारे 1977 मध्ये मुलायमसिंह पहिल्यांदा मंत्री बनले. यानंतर 1980 मध्ये त्यांची लोक दलाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. हा पक्ष नंतर जनता पक्षाचा भाग झाला. 1982 मध्ये मुलायमसिंह यांची उत्तर प्रदेश विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली.
मातृभूमीच्या हक्कासाठी राजकारणात उतरलेल्या मुलायमसिंहांनी आपल्या राजकीय क्षमतांचा वापर करत 1989 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री बनले. मात्र त्यांच्या नेतृत्वातील सरकार फार काळ टिकले नाही. अवघ्या दोन वर्षांत त्यांचे सरकार कोसळले. त्यानंतर 1993 मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मुलायमसिंह यांनी कांशीराम आणि मायावती यांच्या बहुजन समाज पक्षासोबत हातमिळवणी केली आणि दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले. पण बसपाने पाठिंबा काढून घेतल्याने मुलायसिंग यांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. यानंतर मायावती भाजपाच्या पाठिंब्यावर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या.
राम जन्मभूमी-बाबरी मशद वादाने संपूर्ण देशाच्या राजकारणाचा पट बदलून टाकला. या आंदोलनातील कारसेवकांवर गोळ्या घालण्याचे आदेश देऊन मुलायमसिंहांनी अप्रत्यक्षपणाने भाजपाला संजीवनी देण्याचे काम केले होते. त्यानंतर घडलेल्या घडमोडींनंतर 1992 मध्ये जनता दलातून बाहेर पडून त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. 1995 मध्ये मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेल्यानंतर मुलायमसिंह राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले. 1996 मध्ये मैनपुरी लोकसभा मतदार संघातून 11 व्या लोकसभेत निवडून गेले. त्यावेळी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. अशा त्रिशंकू स्थितीत मुलायमसिंह किंगमेकर बनले.
तिसऱ्या आघाडीच्या सरकारमध्ये स्वतः संरक्षण मंत्री बनताना आपल्या पक्षाच्या अनेक नेत्यांना मंत्रिपदे मिळवून दिली. हा कार्यकाळसुद्धा दीर्घकाळ चालला नाही. कारण 1998 मध्ये हे केंद्रातील सरकार कोसळले. त्यानंतर मुलायमसिंह 29 ऑगस्ट 2003 रोजी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आणि 11 मे 2007 पर्यंत राज्यातील सत्ता सांभाळली. गेल्या काही वर्षांत मुलायमसिंहांची लोकप्रियता घटत गेली. मुलायमसिंगांनीही घराणेशाहीच्या वृत्तीला जोरदार विरोध केला होता. वेळ आल्यावर मात्र याच मुलायमसिंगांनी आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्यात कसलाही मुलाहिजा बाळगला नाही. तसेच समाजवादी तत्वांशीही त्यांनी फारकत घेतल्याची टीका सर्वदूर होऊ लागली.
समाजवादी चळवळ ही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात प्रसिद्ध झाली ती या चळवळीतील नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या साध्या विचारसरणीमुळे आणि वर्तनामुळे. जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, बॅ. नाथ पै, राम मनोहर लोहिया अशा समाजवाद्यांचे आयुष्य पाहिले तर या मंडळींनी भारतातील गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत संघर्ष केला, हे लक्षात येते. केवळ समाजवादी विचार मांडून हे नेते थांबले नाहीत तर आपल्या वर्तनातूनही त्यांनी समाजवादाचा आदर्श घालून दिला होता. महाराष्ट्रात एस. एम. जोशी, मधु लिमये, मधु दंडवते, नानासाहेब गोरे, ग. प्र. प्रधान, डॉ. बाबा आढाव अशी समाजवादी नेत्यांची मोठी परंपरा आढळून येते. या नेत्यांशी अनेकांचे वैचारिक मतभेद असतील मात्र या नेत्यांनी आयुष्यात एकदाही जनतेच्या पैशाचा अपव्यय केला, असा आरोप या मंडळींच्या विरोधकांनाही कधी करता आला नाही. नंतरच्या काळात समाजवादी पक्षात फूट पडत गेली. आता मुलायमसिंहांकडून राजकारणाचे बाळकडू घेतलेले अखिलेश यादव त्यांचा वारसा पुढे नेत आहेत.
मुलायमसिंह यांच्या निधनाने तब्बल आठ वेळा विधानसभा सदस्य राहिलेला आणि सात वेळा लोकसभा सदस्य राहिलेला प्रचंड अनुभवी नेता हरपला आहे. भारतीय राजकारणाचा इतिहास त्यांची दखल घेतल्याविना अपूर्ण राहणारा आहे.
– विश्वास सरदेशमुख