श्री रविदासजी महाराज शिरसाठ
बहु जव जव होये । तव तव काहीच न होये । काही नहोनि आहे । अवघाचि जो ।।3।।
जगद्विषयक बहुभवनाची प्रक्रिया येथे स्पष्ट करतात. तो परमात्मा जेव्हा जेव्हा नानात्वाने जगदाकार होतो, तेव्हा तेव्हा तत्त्वतः तो काहीच होत नाही. याचा अर्थ काहीतरी “होण्या’मध्ये कार्यरूपता आहे, विकारित्त्व आहे आणि परिणामी प्रध्वंस आहे.
कारण “होणे’ हा शब्द “न होणे’चा प्रतियोगी आहे. घटोत्पत्ती मानली की घटाचा प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव अनिवार्यपणे मानावेच लागतात. ही आपत्ती येऊ नये म्हणून “तव तव काहीच न होये’ असे म्हटले आहे. याचा अर्थ तो काहीच न होता निर्विकार, अपरिवर्तनीय राहतो.
जगद्रुपी कार्याच्या होण्याने त्याच्याकडे किमान कारणत्व तरी येईलच. परंतु कारणत्वाच्या संबंधाने त्याची असंगता बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून “काही नहोनि’ असा शब्दप्रयोग करून त्याची असंगता कायम राखली आहे.
म्हणजे जगताच्या होण्यानेही त्याच्यात कोणताही विकार न होता, परिवर्तन न होता तो जसाचा तसा आणि “अवघाचि’ म्हणजे परिपूर्ण राहतो..
- चांगदेवपासष्टी तत्त्वचिंतन (भाग – 4)