फलटण – फलटण तालुक्यात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतीचे व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी फलटण तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन बाधित पिकांची पाहणी केली व त्यांच्याशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य ती मदत दिली जाईल, असे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज फलटण तालुक्यातील कापडगाव, तरडगाव, काळज येथील शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निबांळकर, आमदार दीपक चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस उप अधीक्षक धीरज पाटील, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार हणमंत पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री शिवतारे यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे कांदा, सोयाबीन, मका, ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच फळबागांचेही विशेषत: द्राक्ष आणि डाळींब पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे सोमवारपर्यंत पंचनामे करुन त्यांची पूर्णपणे पाहणी करुन मंगळवारपर्यंत त्याचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद रोड, तलाव, विहिरी, इतर सर्व नुकसानीचे पंचनामेही संबंधित अधिकाऱ्यांनी करावेत आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मंगळवारपर्यंत अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्याचे सांगितले. जे जे पंचनामे होतील व त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता होईल तशी शेतकऱ्यांना ताबडतोब मदत दिली जाईल, नुकसान झालेल्या सर्वांना मदत दिली जाईल असेही शिवतारे यांनी यावेळी सांगितले.