पारनेर -करोना आपत्तीमुळे शेतमालाला बाजार भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यात नामांकित कंपनीचे बाजरीचे बियाणे शेतात पेरून ते उगवले नसल्याचा धक्कादायक प्रकार पारनेर तालुक्यात घडला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पारनेर कृषी विभागाकडून या पिकांची पाहणी सुरू करण्यात आली असून, पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र शेतकऱ्यांचा पैसा व वेळ यामुळे वाया गेला आहे.त्यामुळे या नुकसानास जबाबदार असणाऱ्या कंपनीवर कारवाई होणार करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
करोनामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजापेठ उपलब्ध होत नसल्याने पिकवलेला माल विकायचा कसा? विक्रीस आलेला माल फेकून देण्याशिवाय पर्याय शेतकऱ्यांकडे नाही. त्यामुळे पिकावर केलेला खर्च निघाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यात समाधानकारक कारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बाजरी पिकाची पेरणी केली. नामांकित असणाऱ्या व शेतकऱ्यांची पसंती असणाऱ्या कंपनीच्या बाजरी बियाण्याची पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर समाधानकारक पाऊस देखील झाला. परंतु पेरणी होऊन आठवडा झाल्यानंतर देखील बाजरी उगवली नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. इतर शेतकऱ्यांबाबतही असेच झाले. तालुक्यातील देवीभोयरे, पठारवाडी, पिंपरी जलसेन, निघोज, जवळा येथीलही शेतकऱ्यांनी अशाच तक्रीर केल्या आहेत.
नामांकित कंपनीने शेतकऱ्यांना जुने बियाणे देऊन गंडा घातला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून येत असून, सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तत्काळ मदत मिळावी. तसेच या नामांकित कंपनीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
पाऊस वेळेवर झाल्यामुळे पेरणी झाली आहे. मात्र या कंपनीच्या गलथानपणामुळे बाजरी उगवली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया गेला आहे. त्यामुळे पुन्हा दुबार पेरणी काय करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
पंचनामे करून मदत मिळावी
अनेक गावांतील शेतकऱ्यांनी या नामांकित कंपनीचे बाजरी बियाणे खरेदी केले होते. त्या सर्वच शेतकऱ्यांची बाजरी उगवली नसल्याची लक्षात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासन दरबारी आम्हास पंचनामे करून मदत मिळावी व खराब बियाणे देऊन शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी संतोष भाऊ गाजरे यांनी केली आहे.