हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि गुणी कलाकार सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यानिमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवर बोट ठेवण्यात येत आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया देताना या विषयाला तोंड फोडले आणि त्यानंतर विविध समाज माध्यमांमध्ये आणि इतर माध्यमांमध्येही बॉलीवूडमधील घराणेशाहीवर चर्चा जोर धरू लागली आहे. या घराणेशाहीमुळे सुशांतसिंह राजपूतला आत्महत्या करावी लागली, अशा प्रकारचे निष्कर्षही काढण्यात येऊ लागले आहेत.
मूळचा बिहारचा असलेल्या सुशांतसिंह राजपूतच्या राज्यामध्ये तेथील काही नेत्यांनी करण जोहर, सलमान खान, आलिया भट यासारख्या कलाकारांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. अर्थात, सुशांत सिंहच्या आत्महत्येच्या निमित्ताने कंगनाने बॉलीवूडमधील घराणेशाहीवर बोट ठेवले असले तरी यापूर्वी तिने अनेक वेळा या विषयाला तोंड फोडले होते आणि बॉलीवूडमधील काही घराणी इतर लोकांना चित्रपटसृष्टीमध्ये टिकूच देत नाहीत, असा आरोपही केला होता. बॉलीवूडमध्ये घराणेशाही आहे, हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही; पण या घराणेशाहीमुळे गुणी अभिनेत्याला आपला जीव गमवावा लागला असेल, असा निष्कर्ष काढणे सध्यातरी चुकीचे ठरेल. कारण एकतर मनोरंजनसृष्टीमध्ये घराण्याच्या नावापेक्षाही कलाकाराची गुणवत्ता आणि कामावरील निष्ठा यामुळेच तो टिकून राहतो. हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणत्याही घराण्याशी संबंध नसतानाही शाहरुख खान आणि अक्षयकुमार यासारखे अभिनेते गेले कित्येक वर्षे ठामपणे या क्षेत्रामध्ये पाय रोवून उभे आहेत. दुसरीकडे घराणेशाहीचा आशीर्वाद असूनही काही कलाकार अद्यापही या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी धडपडत आहेत.
बॉलीवूडमधील प्रमुख घराणे असलेल्या कपूर घराण्यातील अनेक कलाकार या क्षेत्रांमध्ये असले तरी ज्यांच्याकडे गुणवत्ता होती तेच या क्षेत्रामध्ये यशस्वी झाले. अन्यथा राजकपूरचा धाकटा मुलगा राजीव कपूर या क्षेत्रापासून बाजूला गेला नसता. राज कपूरचा दुसरा मुलगा ऋषी कपूर आणि ऋषी कपूरचा मुलगा रणबीर कपूर केवळ आपल्या गुणवत्तेच्या जोरावर या क्षेत्रात टिकून आहेत, हे वास्तवही नाकारता येणार नाही. अनेक कलाकारांची मुले किंवा नातू यांचा या क्षेत्रामध्ये सहज प्रवेश होत असला तरी यश मिळवण्यासाठी त्यांना धडपडावे लागत आहे. राजकारणात ज्याप्रमाणे घराणेशाहीच्या जोरावर सहजपणे आमदार, खासदार किंवा इतर महत्त्वाची पदे मिळतात तसे बॉलीवूडमध्ये शक्य नाही हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झाले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉलीवूडच्या घराणेशाहीमुळे जर सुशांत गेला असेल तर त्याला या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा संधी देणारी एकता कपूर हीसुद्धा एका घराण्याची होती, हेही विसरून चालणार नाही. एकता कपूरने आपल्या टीव्हीवरील मालिकांमध्ये सुशांत सिंहला सातत्याने भूमिका देऊन त्याला टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा बनवले होते. त्यामुळे त्याच्यासाठी बॉलीवूडचे दरवाजे खुले झाले होते.
शाहरुख खानने ज्याप्रमाणे छोट्या पडद्यापासून सुरुवात करून नंतर मोठ्या पडद्यावरील सुपरस्टार असा बहुमान मिळवला होता त्याच दिशेने सुशांत सिंहची पावले पडत आहेत, असे वाटत असतानाच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. पण त्याला खरोखरच बॉलीवूडमधील घराणेशाही जबाबदार आहे का, याचा शोध घ्यावाच लागणार आहे. अर्थात, बॉलीवूडमध्ये काही प्रमाणात कंपूशाही प्रभावी आहे. बॉलीवूडमधील काही निर्माते दिग्दर्शक ठराविक लोकांनाच आपल्या चित्रपटांमध्ये संधी देतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. इतर स्पर्धक कलाकारांचे चित्रपट चालू नयेत किंवा त्यांच्या चित्रपटांना चित्रपटगृह मिळू नयेत यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याच्या घटना काही काळापूर्वी समोर आल्या होत्या. अर्थात, एखाद्या अभिनेत्याला चित्रपटात घेऊन जर तो चित्रपट हमखास चालण्याची खात्री असेल तर निर्माता आणि दिग्दर्शक त्याच कलाकारांचा आग्रह धरतात यात चुकीचे काहीच नाही; पण इतर स्पर्धक कलाकारांचे चित्रपट चालू नयेत म्हणून जर काही जाणीवपूर्वक केले जात असेल तर त्यावर मात्र नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. खरे तर सुशांत सिंह राजपूतचे गेल्या काही वर्षांतील सर्व चित्रपट यशस्वी झाले होते; पण त्याच्या चित्रपटांना चित्रपटगृहे न मिळाल्याने काही चित्रपट डिजिटल माध्यमांवर प्रदर्शित करावे लागल्याने नाराज झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अर्थात, तसे पाहिले तर बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा “गुलाबो सिताबो’ हा बहुचर्चित चित्रपटही गेल्या आठवड्यात डिजिटल माध्यमांवर प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटाचे चांगले कौतुकही होत आहे. नजीकच्या कालावधीमध्ये आणखी काही चित्रपट अशाच प्रकारे प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. साहजिकच चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित न होता डिजिटल माध्यमांवर प्रदर्शित होत आहेत म्हणून सुशांत सिंहला एवढे निराश होण्याचे काहीच कारण नव्हते. अर्थात, कोणत्याही आत्महत्येनंतर विशेषत: सेलिब्रिटीने केलेल्या आत्महत्येनंतर विविध चर्चा समोर येतात तसेच सुशांतच्या आत्महत्येनंतर झालेले आहे. बॉलीवूडमधील घराणेशाहीमुळे सुशांत सिंहचा बळी घेतला असे त्याचे काही निकटवर्तीय म्हणत असले तरी बॉलीवूडमध्ये घराणेशाहीच्या आशीर्वादापेक्षाही गुणवत्ताच यश देते हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झाले आहे, हे विसरून चालणार नाही. नुकतेच निधन पावलेला अभिनेता इरफान खान असो, तसेच नवाजुद्दीन सिद्दीकी वा वेगळ्या प्रकारच्या भूमिका करणारा राजकुमार राव असेल कोणत्याच घराण्यांचा आशीर्वाद नसतानाही ते ठामपणे उभे आहेत.
अभिनेत्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवणे दुःखकारक आहे. अशा घटनेमागे निश्चित कारण शोधले तरच अशा प्रकारच्या घटना भविष्यकाळात टाळता येऊ शकतात. अर्थात, सुशांतच्या आत्महत्येच्या निमित्ताने पुन्हा एकदा बॉलीवूडमधील घराणेशाहीवर चर्चा रंगली, एवढाच याचा अर्थ.