आवश्यकतेनुसार 24 तासही चालू ठेवण्याचे आदेश
पुणे – अन्नधान्य व औषधे यांचा समावेश जीवनाश्यक वस्तूंमध्ये केला आहे. त्यांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सर्व किराणा व औषधांची दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू ठेवावी. तसेच, आवश्यकतेनुसार ही दुकाने 24 तास चालू ठेवण्यात यावी, असे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव चारुशीला तांबेकर यांनी सर्व किराणा व औषध दुकानदारांना दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे अधिकार पुरवठा निरीक्षक, अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक आणि पोलीस यांना दिले आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा, यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. किराणा दुकाने व औषध दुकाने लॉकडाऊनच्या काळात कार्यरत राहतील, असे नमूद केले आहे. मात्र, काही दुकाने बंद असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अशा दुकानांवर विक्रीसाठी अतिरिक्त ताण पडत असल्याने गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासर्व बाबी विचारात घेऊन शासनाने सर्व किराणा व औषधांची दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.