नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात विविध संघटनांनी पुकारला एल्गार
नगर – सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवीत सीएए व एनआरसी रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरातील समस्त जागृक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाजबांधबांसह इतर समाजबांधव देखील सहभागी झाले होते. हातात तिरंगे ध्वज व महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन समाजबांधव रस्त्यावर उतरले होते.
शुक्रवारी दुपारी 3 वाजता बारा इमाम कोठला येथून या मोर्चाची सुरुवात झाली. संविधान विरोधी व देशाच्या एकात्मतेला बाधा आनणाऱ्या सीएए व एनआरसीला विरोध दर्शविण्यासाठी आंदोलकांनी काळ्या फिती बांधून व हातात काळे ध्वज फडकविले.
भारत देश के चार सिपाही हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई…. यासह सीएए व एनआरसी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवाजी महाराज, महात्मा गांधी, टिपू सुलतान, महात्मा फुले, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, मौलाना आझाद, भगतसिंह आदी महापुरुषांच्या वेशभुषेत मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. तर काही नागरिकांनी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीसांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
नगर-औरंगाबाद महामार्गावरुन ईदगाह मैदान, स्टेट बॅंक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. हजारोंच्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर उतरुन मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा हजर होता. स्वतः नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक शेरींग दोरजे या मोर्चाच्या बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी उपस्थित होते. तर मोर्चावर व्हिडिओ कॅमेरे व ड्रोन कॅमेरेची करडी नजर होती. मोर्चाच्या नियोजनासाठी नगर-औरंगाबाद रस्त्यावरील वाहतुक दुसऱ्या मार्गांने वळविण्यात आली होती.
या मोर्चात जमिअत उलेमा ए हिंद, अहेले सुन्नत वल जमाअत, तबलिग जमाअत, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जमाअते अहेले हदिस, बहुजन क्रांती मोर्चा, जमाअते ईस्लामे हिंद, वहिदते ईस्लामे, महेदिया जमाअत, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई), वंचित बहुजन आघाडी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, अल्पसंख्याक प्रबोधन मंच, उर्जिता फाउंडेशन, अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ, रहेमत सुलतान फाउंडेशन आदी सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला असता मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
यावेळी मौलानांसह प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली. प्र.पोलीस अधिक्षक सागर पाटील व पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांनी सर्व समाजबांधवांनी शांततेत मोर्चा यशस्वी केल्याबद्दल आभार माणून शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले. मोर्चाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना निवेदन दिले. मोर्चाचा समारोप राष्ट्रगीताने सायंकाळी 5 वाजता झाला. राष्ट्रगीतानंतर देशाच्या एकता व अखंडतेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.मोर्चा अत्यंत शांततेत व शिस्तबध्द पध्दतीने पार पडला.