मेदान (इंडोनेशिया) – इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि भूस्खलनामुळे किमान १२ जण बेपत्ता झाले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरांवरील मोठा भाग ढासळून नदीमध्ये कोसळला आहे.
अतिवृष्टीमुळे नदीला पूर आला असून काठावरच्या गावांमध्ये पूराचे पाणी घुसले आहे. नॉर्थ सुमात्रा प्रांतातील प्रसिद्ध लेक टोबा जवळच्या सिमानगुलाम्पे गावाला पावसाचा मोठा फटका बसला आहे.
या भागात जाणाऱ्या रस्त्यांवर चिखलाचे मोठे थर , दरडी पडल्यामुळे मदत पथके तेथे पोचण्यात अडथळे येत आहेत. दरडी कोसळल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी असलेली किमान १२ घरे गाडली गेली आहेत. त्यामुळे ५० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.