श्रीरामपूर – श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाचे प्रलंबित असलेले साडे पाच कोटी रुपयांचे अनुदान नुकतेच मंजूर झाले आहे. आ.लहू कानडे यांच्या प्रयत्नाने हे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी केवायसी करून अनुदान प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन आ.लहु कानडे यांनी केले आहे.
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. श्रीरामपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान मंजूर झाले होते. कृषी विभाग व आपल्या विभागामार्फत नावानिशी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शेतकऱ्यांनी केवायसी व आवश्यक ती पूर्तता करूनही तालुक्यातील मालुंजा, खानापूर, भामाठाण, नायगाव, पढेगाव, भेर्डापूरसह इतर शेतकऱ्यांच्या खात्यांवर अनुदान प्राप्त झाले नव्हते. तहसीलदार व कृषी विभागीय अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्याकडे शेतकरी वारंवार हेलपाटे मारत होते.
प्रसशासनाने पंचनामे करून अहवाल वरिष्ठांना पाठविल्यानंतर प्रस्ताव मंजूर होऊन अनुदान मंजूर झाले होते. पैकी तालुक्यातील पढेगाव, भेर्डापूर, नायगाव, मालुंजा, खानापूर व भामठाण ही गावे अनुदानापासून वंचित राहिली होती. शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी आ. कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या नेतृत्वाखाली चार वेळा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते. याशिवाय आ. कानडे यांनीही जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न केले.
प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे साडे पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. अखेर आज अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे राहिलेल्या गावांसाठी साडे पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर होऊन ते तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले. हे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करणे गरजेचे असून ,गावातील शेतकऱ्यांनी तातडीने केवायसी करून आपले हक्काचे अनुदान प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन आ. कानडे यांनी केले आहे