जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर : भिगवणला पंधराव्या वित्त आराखड्याविषयी कार्यशाळा
भिगवण -केंद्राच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीसाठी 15 वित्त आयोगाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. ग्रामपंचायतींना पुढील पाच वर्षांकरिता प्रतिव्यक्ती 488 रुपये निधी मिळणार आहे. गावकारभाऱ्यांनी शिक्षण, आरोग्य, रस्ते, ग्रामस्वच्छता आदी बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून विकास आराखडा तयार केल्यास गावाच्या विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी केले.
भिगवण ग्रामपंचायत सभागृहामध्ये पंचायत समिती गणातील गावातील सरपंच, सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या आमचा गांव आमचा विकास उपक्रमाअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेसाठी भिगवणच्या सरपंच वंदना शेलार, उपसरपंच संदीप वाकसे, माजी सरपंच लता चोपडे, माजी उपसरपंच रेखा पाचांगणे, मदनवाडीच्या सरपंच आम्रपाली बंडगर, तक्रारवाडीच्या सरपंच शोभा वाघ, डिकसळचे सरपंच सूर्यकांत सवाणे व पदाधिकारी उपस्थित होते.
विस्तार अधिकारी हनुमंत बागल म्हणाले, 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत संस्थाना अधिक सक्षम करण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पदाधिकाऱ्यांनी गावाच्या सर्वांगीण गरजांचा विचार करुन योग्य कारणांसाठी निधीचा आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. प्राथमिक अरोग्य केंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाड्या पाणी शुद्धीकरण यंत्रणा, कचराकुंड्या वृक्ष लागवड संगोपन, मुलीच्या जन्माचे स्वागत आदी महत्वपूर्ण बाबींचा आराखड्यात करण्याच्या सूचना आहेत. त्याचा विचार करावा.
बागल यांनी 15 व्या वित्त आयोगाची मार्गदर्शन तत्वे सांगितली. ग्रामविकास आधिकारी भीमराव भागवत यांनी प्रास्ताविक केले. सरपंच वंदना शेलार यांनी स्वागत केले. अंगणवाडी पर्यवेक्षिका चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. दादासाहेब बंडगर यांनी
आभार मानले.