सातारा (प्रतिनिधी) – ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणुकीतील खर्च, अनामत रक्कम आदींबाबतचे निकष व नियम जाहीर करण्यात आले आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यास उद्या, दि. 23 ते बुधवार, दि. 30 रोजी दुपारी तीनपर्यंत मुदत आहे; परंतु दि. 25 ते दि. 27 या काळात सार्वजनिक सुट्ट्यांमुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे पाच दिवस मिळणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यांना किती खर्च करता येईल, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सात व नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत प्रत्येकी 25 हजार रुपये, 11 ते 13 उमेदवार असलेल्या ग्रामपंचायतीत प्रत्येकी 35 हजार रुपये तर 15 ते 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत प्रत्येकी 50 हजार रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे.
अनुसूचित जाती-जमाती इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये तर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. एका प्रभागातून कमाल चार उमेदवारी अर्ज भरता येतील. एका प्रभागात भरलेल्या अर्जांमधून एक अर्ज वैध धरला जाईल.
निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करत असल्याचे हमीपत्र, अपत्यांबाबतचे घोषणापत्र, शौचालयाचा वापर करत असल्याचे प्रमाणपत्र, अनामत रकमेची पावती, ग्रामपंचायतीचा थकबाकीदार, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र व बॅंक पासबुक (राष्ट्रीयीकृत तथा शेड्युल्ड बॅंक) ही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.