पिंपरी – मराठा, धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. इतर आरक्षणाला कोणताच धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्याचा प्रयत्न चालू आहे. तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण, ते उच्च न्यायालयात टिकला नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला. तो निर्णय उच्च न्यायालयात टिकले पण सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार घटनेच्या तरतुदीत टिकेल, असे आरक्षण देण्यास महायुतीचे सरकार कटिबद्ध असल्याचा पुर्नउच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (दि.24) रविवारी शहर दौऱ्यावर होते. पवार यांनी निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या 670 झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच पवार यांनी दिवसभर शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, संजोग वाघेरे, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी (दि.23) मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. यावर आता त्यांनी खुलासा केला आहे. शनिवारी मी बारामतीला वेळ दिली होती. गृहनिर्माण संस्था, बारामती बॅंक, खरेदी विक्री संघ, दूध संघ, बाजार समिती या संस्थांची वर्षातून एकदाच सर्वसाधारण सभा होती. ही सभा 15 दिवस अगोदरच ठरविली होती. या सभेला मला जायचे होते. त्याबाबत अमित शहा यांचे कार्यालय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविले होते असे पवार यांनी सांगितले.दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधानाबाबत बोलण्यास नकार देतानाच राज्यात वाचाळविरांची संख्या वाढल्याचा टोलाही त्यांनी लगविला.
दिल्लीला गेलो की सही आणतो
मी कामाचा माणूस आहे. त्यामुळे राज्यातील विविध प्रश्नासंदर्भात बैठका घेतो, कामाची माहिती घेतो, अडचणी जाणून घेतो, त्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्न करतो. पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरणाच्या विषय दिल्लापर्यंत पोहचला आहे. फक्त आता एका मंत्र्यांची सही बाकी आहे. मी दिल्लीला गेल्यानंतर संबंधितांना भेटून सही घेणार आहे. त्यामुळे शहरवासीयांचे निगडी ते कात्रज मेट्रोचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पडणार आहे. स्वारगेटला मेट्रोसाठी भूमिगत काम करायचे आहे. त्या ठिकाणी भूयारी मार्ग करण्याशिवाय पर्याय नाही. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी कामाला लागलो आहे.