ओतूरमध्ये शेतकरी जनआक्रोश आंदोलन
ओतूर : राज्यासह देशातील सरकारचे कांदा निर्यातीबाबत चुकीचे धोरण आहे. कांदा निर्यातकर कमी करण्यासाठी प्रयत्न करून या दोन्हीही सरकारला दणका देऊन शेतकरी सुखी करू, असे प्रतिपादन राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांनी केले.
ओतूर (ता. जुन्नर) येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जनआक्रोश आंदोलनावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार अतुल बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाइस चेअरमन अशोक घोलप, बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे, संजय भुजबळ, प्रमोद खांडगे, जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती विशाल तांबे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, बाजीराव ढोले, ओतूरच्या सरपंच गीता पानसरे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, डुंबरवाडीचे सरपंच तान्हाजी डुंबरे, अनिल तांबे, विनायक तांबे, संतोष तांबे, सुदाम घोलप, उज्वला शेवाळे, सुरेखा वेठेकर, अक्षदा मांडे, वैष्णवी चतुर सह परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित होते. यावेळी परिसरातून सुमारे दोनशेच्या वर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसिलदार रविंद्र सबनिस यांना देण्यात आले.
मुंडे म्हणाले, खते, औषधे यावर लागणारा कर व वाढती मजुरी पाहता शेतकऱ्यांना उत्पादन खर्च तिप्पट झालाय. कांद्याला मिळणारा अत्यल्प बाजारभाव बघता शेतकरी अडचणीत सापडलाय. भाजप सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असून, शेतकऱ्यांना नष्ट करण्याचे धोरण राबवत आहे. या सरकारचे सत्तांतर नाट्य झाले, मंत्रीमंडळ स्थापन झाले, पालकमंत्र्यांच्या निवडी होतील यातच सरकारचे दिवस चालले आहेत. शेतकरी जनतेच्या समस्या सोडविणार कधी, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. ठाकरे सरकारच्या काळात निर्यात कर बाबत प्रस्ताव दिल्याने मागील वर्षी कांदा निर्यातीवरील कर कमी करण्यात आला होता. परंतु सरकारचे मंत्री जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्कार समारंभात रमले आहे.
आमदार अतुल बेनके म्हणाले, कांदा दरवाढीबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमवेत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेतली. राज्य सरकारने कांदा प्रश्नी निर्यातीवरील कर कमी करण्यासाठी प्रस्ताव पाठविणे गरजेचे असल्याने याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार व धनंजय मुंडे यांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी विमा योजना सुरू करून शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करावे, अशी मागणी केली असता बाजार समितीचे माजी सभापती ऍड. संजय काळे यांनी आगामी काळात ती राबवण्याचे मान्य केले.
उसाचे रिकव्हरी बेस बदलून शेतकऱ्यांवर अन्याय, कांदा आयात निर्यात चुकीचे धोरण, सोयाबीन वायदे बाजारमुळे झालेले नुकसान, वीज बिलांचा प्रश्न मिटला पाहिजे, अशा विविध मागण्यांबाबत शेतकरी नेते तानाजी बेनके, अंबादास हांडे, लक्ष्मण शिंदे, राजेंद्र महाराज फापाळे, संजय भुजबळ, प्रमोद खांडगे यांनी आपली मते व्यक्त केली. उपविभागीय पोलीस अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सूत्रसंचलन जयप्रकाश डुंबरे यांनी केले तर पांडुरंग पवार यांनी आभार मानले.
50 खोके.. एकदम ओके…
नको ती झाडी, नको ते डोंगार नको ते हाटेल
निर्यातबंदी नाही ओके, निर्यात चालू एकदम ओके
नाही तर म्हणू माझे खोके, 50 खोके एकदम ओके
अशी कविता म्हणत आमदार अतुल बेनके यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका करून शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्नांची मांडणी आपल्या खास शैलीतून केली.