खासदार डॉ. कोल्हे, आमदार बेनके यांचे कृषिमंत्र्यांना साकडे
नारायणगाव – केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणातील धरसोडपणाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ओतूर (ता. जुन्नर) येथे मंगळवारी (दि. 13) आक्रोश आंदोलन केले. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमववारी (दि. 12) खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अतुल बेनके यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी आणि निर्यात करात सवलत द्यावी, अशी मागणी केली.
कांद्याला चांगला दर मिळेल अशी स्थिती निर्माण झाली की निर्यात बंदी आणायची आणि कांदा निर्यात बंदी उठवली की निर्यात करात भरमसाठ वाढ करायची या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ओतूर येथे शेतकऱ्यांचे जन आक्रोश आंदोलन होत आहे. आंदोलनाची दखल घेत खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार बेनके यांनी केंद्रीय कृषिमंत्री तोमर आणि राज्यमंत्री चौधरी यांची भेट घेऊन निर्यात बंदी उठवून निर्यात करात सवलत देण्याची मागणी केली.
सध्या कांद्याला 14-15 रुपये किलो दर मिळत आहे. मात्र उत्पादनासाठी 17-18 रुपये खर्च येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीत कांदा विक्री करावी लागते आहे. निर्यात बंदी उठवली आणि निर्यात कर कमी केले तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टळू शकेल अशी भूमिका घेत खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार बेनके यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना साकडे घातले आहे.