पिंपरी – जनांवरांमध्ये लम्पी आजाराचा प्रसार होत असल्याने गाय व म्हशीचे दूध प्यावे की नाही या बाबत नागरिकांमध्ये संभ्रम होता. मात्र मानवी आरोग्याला त्याचा धोका नसल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रसार होत आहे. साथीचा आजार असल्याने जनावरे आजारी पडत आहेत. त्याच्यापासून बचाव होण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. जनावरांचे आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात अद्याप तरी लम्पी आजाराची जनावरे सापडली नसल्याचे पशू वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात येत आहे. या आजारांच्या गायीचे अथवा म्हशीचे दूध पिल्यास आपल्यालाही आजाराची लागण होईल का ? अशी चिंता नागरिकांमध्ये आहे.
मात्र नागरिकांनी निश्चिंत राहण्याचे आवाहन पशू वैद्यकीय विभागाने केले आहे. या आजारापासून मानवी आरोग्याला धोका नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. सध्या तरी केवळ जनांवरांमध्येच हा आजार फोफावत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अनेकांचा गायी म्हैशीचा गोठा आहे.
ज्यांच्याकडे दहा पेक्षा अधिक गायी, म्हशींचा गोठा आहे त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. पाच पेक्षा अधिक गायी, म्हैशी आजारी पडल्यास नागरिकांनी त्वरित संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करणे गरजेचे आहे. तसेच गोठ्यामध्ये मच्छर होऊ नये, यासाठी कडुलिंबाच्या पानांचा धूर करावा, असे आवाहन पशू वैद्यकीय विभागाकडून करण्यात येत आहे.
लम्पी आजार जनांवरामध्ये आढळत आहे. त्याचा अद्याप तरी नागरिकांना त्रास होत नसल्याचे दिसते. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ज्यांच्याकडे दहा पेक्षा अधिक प्रमाणात जनावरांचा गोठा आहेत त्यांनी पाच पेक्षा अधिक जनावरे आजारी पडल्यास आम्हाला संपर्क करावा. पुढील कार्यवाही करू.
– डॉ. अरूण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.