नवी दिल्ली – देशभरामध्ये सध्या कोरोना संकट बळावताना दिसत असून ताज्या आकडेवारीनुसार देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १६३७ इतकी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाची साखळी खंडित करता यावी यासाठी अवघा देश सध्या लॉक डाऊन करण्यात आलाय. लॉक डाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्यांची उपासमार होऊ नये यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येतायेत.
अशातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील शिधापत्रिका नसणाऱ्या गरीब नागरिकांसाठी एका नव्या योजनेची घोषणा केली असून यानुसार दिल्लीतील शिधापत्रिका नसणाऱ्या नागरिकांना देखील सरकारी योजनांचा लाभ भेटणार आहे. मात्र यासाठी नागरिकांना दिल्ली सरकारच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी लागणार असून यानंतर त्यांना सरकारी सवलतींचा लाभ भेटेल.