रेडा (वार्ताहर) – कोपर्डी बलात्कार व हत्याकांड प्रकरणाला (दि.13) चार वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु त्या भगिनीला अद्याप न्याय देण्यात राज्य शासनाला अजूनही यश आले नाही. याप्रकरणी सरकारने तातडीने पावले उचलून पीडित भगिणला न्याय द्यावा; अन्यथा सरकारविरोधात रस्त्यावर उतरू. अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजावरील अन्यायाबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्यभर शांततेच्या स्वरूपात आंदोलने करीत आहे. तरीही सरकारने कोपर्डीच्या पीडितेला चार वर्षांत न्याय मिळू शकत नाही. तिला न्याय मिळावा, यासाठी हे सरकार कुचकामी ठरत आहे.
मराठा समाजाच्या अन्य मागण्या मान्य कराव्यात, यासाठीच जनतेने सरकारला निवडून दिले आहे. परंतु हे सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. यापेक्षा दुर्दैव काय असावे, असा आरोप त्यांनी केला आहे. जिल्हा परिषद सदस्या पाटील यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन दिले आहे.