मुंबई – अर्णब गोस्वामी यांना जामिनाचा अंतरिम दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच फिर्यादी आज्ञा नाईक, राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या जामिन अर्जावर आता उद्या (शुक्रवारी) दुपारी सुनावणी होणार आहे. यामुळे सध्यातरी अर्णब गोस्वामींना अंतरिम दिलासा नाहीच असे म्हणावे लागेल.
या प्रकरणी अलिबाग सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल करण्यात आला आहे. ज्यावर 7 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली असून तोपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत राहावे लागण्याची शक्यता आहे.
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा. तसेच पोलिसांची अटक कारवाई अवैध ठरवावी या मागणीसाठी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या मुंबईतील राहत्या घरून अटक केली होती.
गोस्वामी यांना अलिबागच्या मॅजिस्ट्रेट न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अलिबागच्या मॅजिस्ट्रेट न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीची पोलिसांची मागणी फेटाळून लावत गोस्वामी यांना 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
त्यानंतर अर्णव गोस्वामी आणि या गुन्ह्यातील इतर दोन आरोपींनी न्यायालयासमोर जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयाने यावर पोलिसांना बाजू मागण्यासाठी वेळ देत यावर सुनावणीची निश्चित तारीख ठरवली नव्हती.
एकीकडे अर्णब गोस्वामी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. तर दुसरीकडे अन्वय नाईक यांची मुलगी आद्या नाईक यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.