मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही, ते असते तर ही वेळ आली नसती, असा घरचा आहेर भाजप नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते.
एकनाथ खडसे म्हणाले कि, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगे, नितीन गडकरी अशा अनेक नेत्यांनी पक्षासाठी काम केले. या नेत्यांमुळेच भाजपची शेटजी, भटजींचा पक्ष अशी ओळख बदलून बहुजन समाजाचा पक्ष अशी बनविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच गोपीनाथ मुंडे असताना आम्ही नेहमीच हसत-खेळत राजकारण केले. परंतु, भाजपच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर आणि द्वेषभावना आहे. निवडणुकीत तिकीट दिले नाही त्यामागे राजकारण असल्याचे खडसेंनी सांगितले आहे. रोहिणी खडसे तिकीट मागत नव्हत्या तरीही दिले. रोहिणी आणि पंकजा यांच्या पराभवामागे षडयंत्र असल्याचे एकनाथ खडसेंनी सांगितले.
दरम्यान, पंकजा मुंडे आज एखाद्या सामाजिक संघटनेची घोषणा करण्याची शक्यता आहे. माळी, धनगर, वंजारी, बंजारा, राजपूत या समाजाची एकत्र मोट त्या बांधण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गोपीनाथ गडावर आज नव्या संघटनेची घोषणा होणार का याकडे लक्ष लागले आहे.