रवी ठाकर
पवनानगर – दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे पवन मावळची ओळख असलेल्या ढोल पथकांनादेखील वादनासाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे पवन मावळातील झांज पथकांमधील तरूणांना चांगला रोजगार मिळाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबईतील अनेक सिनेअभिनेते, अभिनेत्रींच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत वादन सेवा बजावण्यासाठी ही पथके रवाना होण्याच्या तयारीत आहेत.
गणेशोत्सव म्हटलं की गणेशभक्तांचा ओसांडून वाहणारा उत्साह….आनंद….भक्ती…!अशा जल्लोषपूर्ण वातावरणात सुरु होते या उत्सवाची तयारी. भारतीय वाद्य संस्कृतीतील ढोल हे एक चर्मवाद्य…अन् त्याच्या जोडीला ताशा आलाच. गणेशोत्सवाच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरु झाली आहे. त्यामुळे पवनानगर परिसरातील ढोल-लेझीम पथकांची गणरायाच्या प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुकीसाठी शहरी भागातील गणेश मंडळे ढोल पथकांना सुपारी देत असतात. यासाठी ढोल पथकातील कार्यकर्ते पावसातही मंडळांचे कार्यकर्ते मिरवणुकीत करावयाच्या खेळांचा सराव करीत असल्याचे चित्र गणरायाच्या आगमनापूर्वी पहायला मिळत होते.
आपल्या मंडळाच्या गणेशमूर्ती वाजत-गाजत मिरवणूक काढून आणावी व त्याच जल्लोषात विसर्जनही करावे, असा कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो.त्यासाठी वादनसेवा पुरविणाऱ्या पवनमावळातील ढोल पथकांची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा अखंडणे चालु ठेवण्यात तरूणांचा मोठा वाटा आहे. मावळातील प्रत्येक गावामध्ये एक किंवा दोन ढोल लेझीम पथके आहेत. प्रत्येक पथकामध्ये कमीत कमी दहा ढोल, दहा ताशे, एक घंटा व 16 खेळाडु असा एकूण पन्नास कार्यकर्त्यांचा ताफा असतो.
गणेशोत्सव म्हटले की, पारंपरिक कलेबरोबर उदरनिर्वाह करण्यासाठी चांगले पैसेही मिळतात. या मावळातील काही ढोल पथकांना बाराही महिने सुपाऱ्या असतात. यामधुन मिळणारे उत्पन्न प्रत्येकी वाटुन घेतले जाते तर काही मंडळे मिळालेली रक्कम गावामध्ये सामजिक कार्यासाठी वापरली जाते. यामध्ये महागाव, काले, अजिवली, शिळीम, ब्राह्मणोली शिवली.धनगव्हाण, कडधे, कोथुर्णे, वारू, जवण या गावांमध्ये दोन ढोलपथके आहेत. काही मंडळाची बुकिंग एक महिनाअगोदर झाली आहे. मंडळांना 50 हजार रूपयांपासुन ते 2 लाखापर्यंत सुपारी म्हणुन रक्कम दिली जाते त्यामुळे गणपती उत्सवामध्ये अनेक कार्यकर्त्यांना अर्थिक उत्पन्न मिळते आणि गणेशाची भक्तिरूपी सेवाही करता येते.