अत्यावश्यक सेवा मिळणे अवघड
वीसगाव खोरे – भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील बहुतांशी गावे डोंगराळ असल्याने येथे मोबाइल नेटवर्कची मोठी समस्या निर्माण झाली आहे. येथील अनेक शेतकऱ्यांकडे ऍण्ड्रॉइड फोन आहेत. मात्र, नेटवर्कच नसल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोबाइलवरून ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक, शेतकरी वर्गाला इ-केवायसी करणे, पीक नोंदणी करणे, अत्यावश्यक सुविधा मिळणे, ऍम्ब्युलन्स अथवा पोलीस मदत हवी असल्यास त्यांना अडचणी येत आहेत.
संगणक प्रणालीचा उपयोग सर्वच ठिकाणीं प्रभावी आणि गतिमान झाला असून त्यात सुसूत्रता आली आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी सुरू केले असून शेतकऱ्याला त्याच्या शेतातील पिकांची नोंद स्वतः सातबाऱ्यावर करता यावी आणि शासकीय योजनांचा लाभ घेता यावा त्याकरिता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रशिक्षण देण्यात आले; परंतु त्यासाठी अँड्रॉइड फोनची गरज आहे. ग्रामीण भाग असला तरी बऱ्याच शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइलआहेत; परंतु नेटवर्कअभावी अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासाठी मोबाइल टॉवर उभे करण्यात यावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत.
वीसगाव खोऱ्यातील गावे डोंगराळ भागात असून गावात नेटवर्कच्या अडचणी आहेत, शासकीय अनेक कामे ऑनलाइन करावी लागत असल्याने वीसगाव खोऱ्यात मोबाइल टॉवरवरून मिळणारी सुविधा अद्ययावत करण्यासाठीचे निवेदन पुणे येथील रिलायन्स जिओ ऑफिसला निवेदन देण्यात आले. त्यास प्रतिसाद मिळाला आहे.
– अनिल सावले, युवा नेते, भोर
भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यात नेटवर्कमध्ये अडचणी येत असल्याने ई पीक पाहणी, पीएम शेतकरी सन्मान निधी, इ- केवायसी करणे अवघड झाले आहे, त्यामुळे नेटवर्कसाठी नवीन टॉवर बसवावे.
– गोरख मानकर, प्रगतशील शेतकरी, मानकरवाडी (ता. भोर)