नवी दिल्ली – गोवा विधानसभेची मुख्य लढत ही कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षातच आहे, आम आदमी पक्ष आणि तृणमुल कॉंग्रेस पक्ष या स्पर्धेतही नाहीत असे विधान कॉंग्रेसचे गोव्यातील निरीक्षक पी चिदंबरम यांनी केले आहे.
दरम्यान चिदंबरम यांच्या दाव्याला आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी तितकेच तिखट उत्तर दिले असून त्यांनी म्हटले आहे की, गोव्यातील नागरीक त्यांना ज्या पक्षाकडून आशा वाटते त्यांना मतदान करणार आहेत. कॉंग्रेस ही केवळ भाजपची आशा आहे, गोवेकरांची नाही असे त्यांनी म्हटले आहे.
गोव्यात आपल्या पक्षाला पुर्ण बहुमत मिळाले नाही तर येथे आघाडीचे सरकार स्थापन करण्यास तयार आहोत असे विधान केजरीवाल यांनी मध्यंतरी केले होते त्याला प्रत्युत्तर देताना चिदंबरम यांनी वरील विधान केले होते. चिदंबरम यांनी म्हटले आहे की आम आदमी पक्ष आणि तृणमुल कॉंग्रेस पक्ष केवळ भाजप विरोधी मतांमध्ये फाटाफूट घडवण्याचेच काम करीत आहेत. तथापि गोव्यात ज्यांना खऱ्या अर्थाने परिवर्तन हवे आहे तर कॉंग्रेसलाच मतदान करतील असा विश्वास चिदंबरम यांनी व्यक्त केला. त्यांनी ट्विटरवर हे विधान केल्यानंतर केजरीवाल यांनीही त्यांच्या विधानांचा ट्विटरवरच समाचार घेतला.