पुणे -आंबिल ओढा कारवाईवरून महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधीपक्षांनी मौन बाळगले असले, तरी याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
आंबिल ओढाप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी महापालिकेबाहेर आंदोलनास बसलेल्या नागरिकांना सुळे यांनी भेट दिली. त्यावेळी आंदोलकांनी या कारवाईत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी सुळे यांनी “कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.
जर कोणता बांधकाम व्यावसायिक अथवा अधिकारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या सांगण्यावरून आंबिल ओढ्याची कारवाई केली आणि मी अजित पवारांचा माणूस आहे, असे सांगत असेल तर मला तसे पुरावे द्या.
मी स्वतः पोलिसात त्याविषयी तक्रार करीन,’ अशी भूमिकाच सुळे यांनी घेतली. परिणामी, सुळे यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत असून, पवार यांच्यावर आरोप होत असतानाही; सुळे यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना काहीच बोलता येत नसल्याने याप्रकरणी आता राष्ट्रवादीचीच कोंडी झाली आहे.