कालवा समिती बैठकीत आमदार धंगेकर यांची मागणी
पुणे – पाणी टंचाईमुळे पुणे शहरात स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या आगामी काळात वाढू शकते, ही संख्या सुमारे दोन लाखांच्या घरात जाऊ शकते. तसेच पुणे शहराची लोकसंख्या विचारात घेता शहराचे पाणी कमी करू नये. उलट शहराला जादा कोटा मंजूर करावा, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. पुणे शहरासाठी मुळशी धरणाचे पाणी आणावे, अशी मागणी धंगेकर यांनी केली.
कालवा समिती बैठकीनंतर धंगेकर म्हणाले, “वाढीव गावांमुळे व वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा समतोल राखावा. पाण्याचा कोटा वाढवून मिळावा, शहराला चांगले पाणी मिळायला पाहिजे,’ अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
“त्यांची’ आता गरज नाही…
या बैठकीला कोथरुडचे आमदार तसेच माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील अनुपस्थित होते. त्यावर आमदार धंगेकर म्हणाले, “तथाकथित पालकमंत्र्यांची आता गरज नाही. सहपालकमंत्री ही त्यांच्या डोक्यातून आयडिया आली, चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूरकडे जाण्याचा प्रवास सोलापूरमार्गे सुरू आहे.’