श्रीकांत कात्रे
सातारा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक दिल्ली वारी केली. मात्र, तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवरच जाण्याची शक्यता आहे. या विस्तारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार आहे. मात्र, सत्तेतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची नावे निश्चित होत नसल्यामुळे विस्ताराचा विषय अजेंड्यावर येऊन त्याकडे पुन्हा दुर्लक्ष केले जात आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगते आहे. काही जिल्ह्यांमधून नेत्यांचे मंत्रिपद निश्चित झाल्याचा आनंदही व्यक्त होत होता. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ही नावे निश्चित झाल्याची खात्री दिली जात होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट झाले तरीही काही प्रमाणात नेतेमंडळी वगळता कार्यकर्ते अजूनही दोन्ही गट एकच आहेत या भावनेतून पक्षाचे काम करत आहेत.
काही अडचणी संपून कधी ना कधी दोही गट एकत्रित येणार, या आशेने कार्यकर्ते स्थानिक पातळीवर एकजिनसीपणा राखण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचदरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराची चाहूल स्पष्ट झाल्याने आपल्यापैकीच कुणी ना कुणी सत्तास्थानी येणार यामुळे पक्ष कार्यकर्ते मरगळ झटकून नवीन मंत्र्यांच्या स्वागताची तयारी करत होते. अजूनही लवकरच तो क्षण येणार असल्याचे ते सांगत आहेत.
या आनंदात बराच काळ निघून गेला. मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा हुलकावणी देणार का, अशी शंका व्यक्त होऊ लागली असतानाच काल उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे चर्चेला उधाण आले. आता निश्चितपणे काही गोड बातमी मिळणार असे वाटत होते. मात्र, विस्ताराच्या दृष्टीने कोणतीच अनुकूल हालचाल दिसली नसल्यामुळे नेमका विस्तार कधी होणार, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील राजकीय वातावरण कधी नव्हते इतके चंचल झाले आहे. काही बाबी न्यायालयीन आहेत. आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच राज्याच्या विकासाची दिशा कशी आहे, हे नेमके स्पष्ट होत नसल्याचे नेते आणि कार्यकर्ते सांगत आहेत. अजित पवार दिल्लीला गेल्यामुळे पल्लवित झालेल्या आशा काही दिवसांपुरत्या तरी मावळल्या आहेत.
नजीकच्या काळात विस्ताराची अपेक्षा
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची नावे निश्चित आहेत. त्यामुळेच अजित पवार यांचे विस्तारासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, घोडे अडले आहे ते भाजप आणि शिवसेनेमुळे. या दोन्ही पक्षांमध्ये संभाव्य मंत्र्यांच्या नावांबद्दल एकमत होत नसल्यामुळे हा विस्तार लांबणीवर पडत सल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, श्री. अजित पवार दिल्लीला जाऊन आल्यामुळे आता या दोन्ही पक्षांमध्ये नावांवर एकमत करण्याच्या कामाला गती येईल आणि नजीकच्या काळात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केले.